विनाअपघात सेवा देण्यास ४६९ चालक पडले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:11+5:302021-02-05T06:07:11+5:30

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ ...

Less than 469 drivers fell to provide accident free service | विनाअपघात सेवा देण्यास ४६९ चालक पडले कमी

विनाअपघात सेवा देण्यास ४६९ चालक पडले कमी

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता ३८१ चालक उत्कृष्ट सेवा बजावीत बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.

‘गाव तेथे एसटी’ असे बिरुद घेऊन महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाची बस वाहतूक केली जाते. प्रत्येक गावापर्यंत एस.टी.चे जाळे पसरले आहे. अतिशय सुरक्षित प्रवास म्हणून एस.टी.च्या प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र, विनाअपघात सेवा देणारे चालक किती, याचा आढावा घेतला तेव्हा ४६९ चालक विनाअपघात सेवा देण्यात कमी पडल्याची बाब समोर आली. एस.टी. महामंडळाच्या परभणी विभागातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत ८५० चालक कार्यरत आहेत. वर्षभराच्या काळात एकही अपघात न करता वाहन चालविणाऱ्या चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे एक वर्षापेक्षा अधिक काळ विनाअपघात सेवा दिल्यास ६०० रुपयांचे बक्षीस दिले जाते. मागील वर्षी परभणी विभागातील ३०४ चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले असून, ७७ चालक ६०० रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या चालकांनी सुरक्षित सेवा देऊन आपले कर्तव्य बजावले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उर्वरित ४६९ चालक मात्र विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, ही बाब समोर येते. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक आणखी सुरक्षित करण्यासाठी बस चालकांना आणखी सतर्क राहून सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात झाले ३१ अपघात

जिल्ह्यात मागील वर्षभरात ३१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये १५ किरकोळ, १२ गंभीर स्वरूपाचे आणि ४ अपघातात मृत्यू ओढावलेला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या वर्षभरात मोठा अपघात एकही झाला नाही. मात्र, दुचाकीला धडक देणे, चुकून वाहन एस.टी.च्या समोर येणे, अशा स्वरूपाचे अपघात घडले आहेत. चालकांना महामंडळाच्या वतीने तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एस.टी.चा प्रवास सुरक्षित मानला जातो.

वेगावर नियंत्रण

एस.टी. महामंडळाच्या बस क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालविल्या जाऊ नयेत. कमी अंतराच्या वाहनांना ७० कि.मी. प्रति तास, तर लांब पल्ल्यांच्या वाहनांना ८० कि.मी. प्रति तास अशी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असते.

Web Title: Less than 469 drivers fell to provide accident free service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.