इंद्रायणी नदीला पूर; सलग तिसऱ्या दिवशी ८ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 15:18 IST2021-07-14T15:13:41+5:302021-07-14T15:18:50+5:30
Rain in Parabhani : मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला.

इंद्रायणी नदीला पूर; सलग तिसऱ्या दिवशी ८ गावांचा संपर्क तुटला
गंगाखेड ( परभणी ) : तालुका व परिसरात मंगळवार रोजीच्या रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने गंगाखेड ते परभणी महामार्गावरील नागठाणा पाटीवरून तालुक्यातील सुनेगाव, सायळा मार्गे मुळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुनेगाव जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सलग तिसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झाला आहे. तसेच भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर ही पाणी आल्याने एकूण ८ गावांचा संपर्क तुटला आहे. ( For the third day in a row, 8 villages were cut off due to flooding Indrayani river )
मागील रविवारपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने गंगाखेड-परभणी महामार्गावरील नागठाणा पाटी येथून सुनेगाव, सायळा मार्गे मुळी, नागठाणा, धारखेड तसेच परभणी तालुक्यातील धसाडी, अंगलगावकडे जाणाऱ्या मार्गावर सुनेगाव जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सोमवारपासून बंद असलेली वाहतूक बुधवारी देखील बंद पडली. सलग तिसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झाला आहे. सुनेगाव, सायळा, मुळी, नागठाणा, धारखेड, धसाडी, अंगलगाव या सात गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे. तर महातपुरी फाटा ते भांबरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर चार ठिकाणी नव्याने उभारलेल्या पुलाची उंची कमी आहे. यामुळे चार पैकी दोन पुलावरून पाणी वाहत असल्याने भांबरवाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला असून गावांचा संपर्क तुटला आहे.
गंगाखेड तालुक्यातील खळी येथून खळी पुनर्वसनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सोंडवरच्या नाल्यास पूर आल्याने हा मार्ग ही बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना दहा ते बारा किलोमीटरचा फेरा मारून खळी पुनर्वसन येथे जावे लागत आहे. त्याच प्रमाणे खळी शिवारातील सर्व्हे नंबर ३८७ मधील दादासाहेब पवार, बाबासाहेब पवार यांच्या शेतात तसेच सर्व्हे ३८८ व ४०२ मधील गणपती सुरवसे, भिमराव सुरवसे, गंगुबाई सुरवसे यांच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. येथे सुमारे ७ हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे.