४५० लाभार्थ्यांना २ कोटी २३ लाख रुपयांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST2021-01-08T04:52:47+5:302021-01-08T04:52:47+5:30
जिंतूर शहरात प्रधानमंत्री आवास योजना व माता रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या वतीने घरकुलांना मंजुरी देण्यात आली ...

४५० लाभार्थ्यांना २ कोटी २३ लाख रुपयांचे वितरण
जिंतूर शहरात प्रधानमंत्री आवास योजना व माता रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या वतीने घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या निधी मोठ्या प्रमाणात अडकला होता. त्यामुळे हे लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहिले होते. मात्र माजी आ. विजय भांबळे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या दोन्ही योजनेतील निधीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याकडून जिंतूर शहरातील ४५० लाभार्थ्यांसाठी २ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर नगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षातील ३६१ लाभार्थ्यांना १ कोटी ६८ लाख ८० हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. तर दुसरीकडे रमाई आवास योजनेंतर्गत ८९ लाभार्थ्यांना ५४ लाख २५ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले अर्धवट घरकुलांचे काम पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत.