परभणीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:42+5:302021-02-24T04:18:42+5:30
टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. ...

परभणीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार
टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कृतीतून दुखापत करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रानिशी गैरकायद्याच्या मंडळींचा सदस्य होऊन दंगा करणे, मारहाण करणे आदी १३ गुन्हे या सदस्यांवर दाखल आहेत. या टोळीच्या संदर्भाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला असून, सदस्यांना हद्दपार करण्याची शिफारस या अहवालात केली आहे. त्यावरून दि. १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यात टोळीप्रमुख लक्ष्मण गायकवाड, सदस्य अनिल अच्युत गायकवाड यांना सहा महिन्यांसाठी, तर सुरेश रामभाऊ पवार आणि आकाश राजाभाऊ जाधव यांना तीन महिन्यासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत. या आदेशानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी वरील आरोपींना जालना व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे नेऊन सोडले आहे.
चार महिन्यांत १४ जणांना हद्दपार
जिल्हा पोलीस प्रशासनाने चार महिन्यांच्या कालावधीत १४ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यात पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची टोळी तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या टोळीतील दहा सदस्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आता चार जणांना हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यापुढेदेखील अशा पद्धतीच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. दहशत पसरविणाऱ्या व बेकायदेशीर वागणाऱ्या टोळ्यांची गैर केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे.