गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गावांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:13+5:302021-02-05T06:07:13+5:30
परभणी : एकतेतूनच गावाचा कायापालट होतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. एकतेतूनच आदर्श गावाची निर्मिती होते, ...

गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गावांची निर्मिती
परभणी : एकतेतूनच गावाचा कायापालट होतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. एकतेतूनच आदर्श गावाची निर्मिती होते, असे प्रतीपादन अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
परभणी तालुक्यातील सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधत झाल्याने प्रजासत्ताक दिनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मलिक बोलत होते. कार्यक्रमास आ.सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नायब तहसिलदार रामदास कोलगणे, गोविंद देशमुख, किरण सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, गावकऱ्यांनी गावात एकोपा ठेवल्यास आदर्श गाव निर्माण होतात. सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गावाची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी माझे गाव सुंदर गाव या मोहिमेत सहभागी होवून गाव स्वच्छ व सुदर बनवावे. गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या कामाध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. गावातील युवकांनी ठरविल्यास गावाचा विकास होवून कायापालट होईल. ग्रामपंचायतींंना थेट निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडेल तसेच या गावचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी उत्तम काम करुन गावाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यतात आले.
आ.सुरेश वरपुडकर यांनी सोन्ना गावात विविध विकासात्मक उपक्रम होतात तसेच या गावामध्ये लोकसहभागामधून पाणंद रस्त्याचे अनेक कामे झाली आहेत, असे सांगून सोन्ना गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित कामांची व नविन प्रस्तावित कामाची माहिती दिली. प्रारंभी डॉ. शाम गमे यांनी गावाच्या समस्या व भविष्यात करावयाच्या कामाची माहिती प्रास्ताविकातून दिली. या कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव गमे, सुधाकर कोंडरे, गणेश टोगराज, गजानन गमे, तारामती दंडवते, लक्ष्मीबाई गादेवाड, सुवर्णमाला सुर्यवंशी, सिमा कदम, संजीवनी देशमुख, ग्रामसेवक ए. बी. दुधाटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.