गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ६६३ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:41+5:302021-07-29T04:18:41+5:30
२० हजार ८०० वाहनांना लावला दंड शहरात २०२० मध्ये २० हजार ७७९ वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपये ...
२० हजार ८०० वाहनांना लावला दंड
शहरात २०२० मध्ये २० हजार ७७९ वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपये दंड लावून वसूल करण्यात आला आहे. या वर्षात मागील ६ महिन्यांत १२ लाखांची वसुली करण्यात आली. यामध्ये अतिवेगाने वाहन चालविणे ४७७ वाहने, ट्रिपल सीट जाणाऱ्या ५३२ वाहने व मोबाइलवर बोलणाऱ्या ६६३ वाहनधारकांना दंड लावण्यात आला आहे.
ब्रीथ ॲनालायझरवरील धूळ हटेना
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी ब्रीथ ॲनालायझरवर वाहनधारकांच्या तोंडात टाकून तपासणी करावी लागते. या तपासणीत वाहनधारकाने मद्यप्राशन केले आहे किंवा नाही, हे स्पष्ट होते. तपासणीत मद्यप्राशन केल्याचे पुढे आले, तर संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाते. २ वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या संसर्ग काळात ब्रीथ ॲनालायझरचा वापर करणे धोकादायक ठरत असल्याने त्याचा वापर बंद करण्यात आला. यामुळे ब्रीथ ॲनालायझरवरील धूळ सध्या तरी हटत नसल्याचे दिसून येते.
शहरात हेल्मेटसक्ती नाहीच
शहराच्या हद्दीत तसेच जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून हेल्मेट वापराची सक्ती नाही. यामुळे सर्व वाहनांना इतर नियम मोडल्याप्रकरणी दंड लावला जातो. विशेष म्हणजे, हेल्मेट न वापरल्याने झालेल्या अपघातात काहींना जीव गमवावा लागला आहे. पण, याकडे दुर्लक्ष केले जाते. मध्यंतरी, पोलीस अधीक्षक कार्यालयात व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या केवळ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहनावर येताना हेल्मेटशिवाय प्रवेश नसल्याचे आदेश काढले होते. याचे पालन येथे केले जात होते.
शहरासह जिल्ह्यातील अपघात व मृत्यू
२०१८ ४२ २५
२०१९ ३८ १९
२०२० ३१ २५
शहरातील माहिती एकत्रित मिळेना
शहरात असलेल्या ३ पोलीस स्टेशनांतर्गत झालेल्या अपघातांची एकत्रित माहिती वाहतूक शाखेकडे उपलब्ध नाही. यासाठी सर्व पोलीस स्टेशनस्तरावर ही माहिती मिळते. यात झालेला मृत्यू अपघातातील असला, तरी तो मोबाइलवर बोलताना झाला की अन्य कारणाने, याची मात्र माहिती मिळणे कठीण आहे.