दहावीचा जिल्ह्याचा ९८.९४ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:04+5:302021-07-17T04:15:04+5:30
कोरोनामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा ...

दहावीचा जिल्ह्याचा ९८.९४ टक्के निकाल
कोरोनामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळांकडे पाठविण्यात आले होते. विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून शुक्रवारी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा सर्वसाधारण निकाल ९८.९४ टक्के लागला आहे. दहावीसाठी जिल्ह्यातील २८ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १४ हजार ८४० पैकी १४ हजार ८२४ मुले (९९.८९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, तर दहावीसाठी प्रविष्ठ झालेल्या १२ हजार ११० मुलींपैकी १२ हजार १०८ (९९.९२ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वसाधारण निकालात परभणी जिल्हा विभागात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल वाढला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील २८ हजार ६८५ पैकी २६ हजार ७ (९०.६६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल उंचावलेलाच
जिल्ह्यातून दहावीसाठी नियमित अंतर्गत २६ हजार ९५७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २६ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९९.९०टक्के इतकी आहे. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील एक हजार ७६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ८४.२४ टक्के आहे.
१५ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
जिल्ह्यातील १५ हजार ३३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर १० हजार ४०४ प्रथम आणि ११७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले असल्याचे निकालांती स्पष्ट झाले आहे. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये आठ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ३६ प्रथम, ३५ द्वितीय तर एक हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
वेबसाइट बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता यावा म्हणून विविध चार वेबसाइट उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवरून निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिवसभर चारही वेबसाइट बंदच असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक निकाल बोर्डाने तयार केले की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.