मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही वाढली आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही हा संसर्ग कमी होत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील दहा आणि खासगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा यात समावेश आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. दररोज १० ते १५ रुग्ण दगावत असल्याने आता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
आरोग्य विभागाला गुरुवारी १ हजार ८८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २५ अहवालांमध्ये ३४३ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ८५८ अहवालांमध्ये ३३३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ५०२ झाली आहे. त्यापैकी १७ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ५९१ वर पोहोचली आहे. सध्या ५ हजार ४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात १४७, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १३५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार २५९ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. उर्वरित रुग्ण परभणी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
५२२ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील ५२२ रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने आरोग्य विभागाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील तीन दिवसांपासून दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांची सुटी होत आहे, ही समाधानाची बाब आहे.