आपण स्वत:ला कधी ओळखणार?
By Admin | Updated: July 11, 2016 14:23 IST2016-07-11T14:23:57+5:302016-07-11T14:23:57+5:30
तुझ्याकडून काही होऊ शकत नाही... तू काही कामाचा नाही... रिकामटेकडाच तू.. असं आपल्याला कोणी म्हटले तर कसं वाटेल? ज्यावेळी एखाद्याकडे ‘होपलेस’ म्हणून पाहिले जाते त्यावेळी ती व्यक्ती पुर्णपणे कोलमडली जाते

आपण स्वत:ला कधी ओळखणार?
- रोहीत नाईक
तुझ्याकडून काही होऊ शकत नाही... तू काही कामाचा नाही... रिकामटेकडाच तू.. असं आपल्याला कोणी म्हटले तर कसं वाटेल? ज्यावेळी एखाद्याकडे ‘होपलेस’ म्हणून पाहिले जाते त्यावेळी ती व्यक्ती पुर्णपणे कोलमडली जाते. अशा वेळी पुन्हा एकदा भरारी घेण्याचे सोडा, ती व्यक्ती पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्नही करत नाही.
आज अनेक तरुणाई खास करुन कॉलेजियन्सना बघतो जे एकदा नैराश्याच्या गर्तेत सापडले की, पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न सोडून देतात. नैराश्य म्हणजे नक्की काय? ते येतं कशामुळे? कित्येकदा आपल्या घरचे आपल्याकडून फारशी अपेक्षा ठेवत नाही. अशावेळी आपल्याला घरच्यांचाही खूप राग येतो. मित्र-मैत्रिणी आपल्याला म्हणावं तेवढे महत्व देत नाही, तेव्हा त्यांचाही आपल्याला राग येतो. पण नाईलाज म्हणा किंवा एकटेपणाची भिती म्हणा तरीही आपण त्यांच्यासोबत एक-एक दिवस ढकलतच असतो. यावर उपाय काय?
आपण असं काहीतरी करायला पाहिजे की या सर्वांना आपली किंमत कळेल, सर्वजण आपलीच चर्चा करतील, असा निश्चय आपण वेळोवेळी कररो. सर्वांची तोंडे गप्प करुन दाखवतो की नाही, असे ढाचे नेहमी मारतो.
पण खरंच असं होतं का?
किंबहुना प्रत्येकवेळी ‘नाही’ हेच उत्तर मिळेल.
का माहितेय? कारण आपण या सर्व नैराश्यामध्ये स्वत:ची ओळख विसरलेलो असतो. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना विसरलेलो असतो. आपण आपल्या गुणांच्या म्हणजेच टॅलण्टचा शोध न घेता, नेहमी निराश राहत असल्यानेच कायम दुरावलेलो राहतो.
मित्रांनो, आपल्याला नेहमी सांगण्यात येते की प्रत्येकामध्ये एक विशिष्ट गुण असतो त्याचा शोध घ्या. आपण घेतो का? बहुतेकजण हा शोध घेत नाही आणि त्यानंतर इतरांच्या टॅलेंटवर टाळ्या वाजवतात. मात्र आपल्या टॅलेंटसाठी कशाप्रकारे टाळ्या वाजल्या जातील, यासाठी कोणीच प्रयत्न करीत नाही.
एक गोष्ट सांगतो, कदाचित काहींना माहितही असेल. ही गोष्ट खूप जुनी आहे अगदी ३०० वर्षांपुर्वीची. कानपूर जिल्ह्यातील एक तरुण नेहमी उनाडक्या करणारा, रिकामा बसणारा म्हणून ओळखला जायचा. त्याच्याकडून कोणीही कोणतीही अपेक्षा केली जात नव्हती. त्या तरुणाला दोन लहान भाऊ होते. दोन्ही भाऊ हुशार पण हा तरुण वयाने मोठा असूनही काहीच कामधंदे करीत नव्हता. मात्र या तरुणामध्ये एक जबरदस्त कला होती. कविता लिहिण्याची. त्याच्या कविता सोडल्या तर लोकांना त्याच्यात काहीच विशेष वाटायचं नाही.
विशेष म्हणजे त्या तरुणाची खासीयत अशी होती की तो चालताबोलता कोणत्याही विषयावर आणि कोणत्याही क्षणी कविता तयार करणारा कवी होता. मात्र याव्यतिरीक्त तो इतर कोणतेही काम करीत नसल्याने लोकांच्या नजरेत तो निव्वळ एक रिकामटेकडाच होता.
एकदा त्या तरुणाने घरी आपल्या वहिनीकडे मीठ मागितलं. तेव्हा त्या तरुणाच्या स्वभावाने वैतागलेल्या वहिनीने टोमणा मारला की, ‘रोज रोज असे मागून खाण्यापेक्षा स्वत: कमावून खात जा’, हा एक टोमणा त्या तरुणाच्या एवढा जिव्हारी लागला की त्यानं तडक ते घर सोडलं आणि एका आश्रमात गेला. खरं तर वहिनीच्या त्या टोमण्याने एक इतिहास घडणार होता.
तो काळ शिवकालीन होता. त्या तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकली होती आणि महाराजांच्या आग्रा भेटीदरम्यान अनुभवलीही होती. त्यामुळे त्या तरुणाने थेट मराठ्यांची राजधानी रायगडावर जाण्याचं ठरवलं. ज्यावेळी तो तरुण रायगडावर पोहचला तेव्हा तेथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरु असला. रायगडावरचा थाटमाट आणि जल्लोष पाहून त्या तरुणाला महाराजांच्या कीर्तीचा आणखी अनुभव आला. त्यावेळी गडावरील सुरु असलेला तो सोहळा पाहत असताना तिथल्या तिथे त्याने गडावरील शिर्काई देवीच्या मंदिराजवर उभे राहून महाराजांना मुजरा म्हणून खालील काव्य गायले...
इन्द्र जिमि जंभ पर ,
वाडव सुअंभ पर ।
रावन सदंभ पर ,
रघुकुल राज है ॥१॥
पौन बरिबाह पर ,
संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर ,
राम द्विजराज है ॥२॥
दावा द्रुमदंड पर ,
चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुण्ड पर ,
जैसे मृगराज है ॥३॥
तेजतम अंस पर ,
कान्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेच्छ बंस पर ,
शेर सिवराज है ॥४॥
त्या महान तरुण कवीचे नाव ‘कवीभूषण’. खरं म्हणजे कवीभूषण यांनी आपल्या कलागुणाच्या जोरावर असा काही इतिहास लिहिला आहे की तब्बल ३०० वर्षांपुर्वी त्यांनी तयार केलेल्या काव्यपंक्ती आज प्रत्येक शिवभक्त अभिमानाने आणि गर्वाने गातो.
आपल्याला आपल्यातली अशी कला, गुण ओळखता आले पाहिजेत.
-