विटा : ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या दोघांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पै. चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा लवकरच सांगली येथे घेणार असून या दोघांत पुन्हा कुस्ती लावून ‘महाराष्ट्र केसरी’चा सुरू असलेला वाद सांगलीत मिटविणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.महाराष्ट्र केसरीची स्पर्धेत पंचानी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत संतप्त शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचे समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत, असे विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचे जाहीर केले.दरम्यान महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी, अशी मागणी होऊ लागली. यावर दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली आहे.
पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती पुन्हा सांगलीत लावणार आहे. निर्विवाद कुस्ती कशी असते हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. या कुस्तीसाठी मी स्वत: वैयक्तिक मोहोळ व राक्षे याला प्रत्येकी २५ लाख रुपये देणार आहे. या दोघांत निर्विवाद कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्राचा वाद सांगलीत मिटणार आहे. - पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोणताही वाद नाही. मी माझे काम केले आहे. प्रशिक्षक व वस्ताद यांनी शिकवल्याप्रमाणे मी कुस्ती करून महाराष्ट्र केसरी झालो. मी पैलवान आहे. पैलवान हा योद्धा असतो. त्याला त्याचे काम करायचे आहे. परत जरी कुस्ती करायची असली तरी ही कुस्ती कधीही व कोठेही घेतली तरी चालेल. त्यासाठी मी तयार आहे. - पृथ्वीराज मोहोळ, महाराष्ट्र केसरी.