सांगली - २०२५ चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे. शिवराज राक्षेसोबत जे घडलं ते चुकीचे आहे. २० वर्षाची मेहनत १० सेकंदात वाया घालवणार असेल तर हे योग्य नाही असं सांगत शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर येथे झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे. या वादावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
या वादावर चंद्रहार पाटील म्हणाले की, कुस्ती स्पर्धेत जे झाले ते चुकीचे होते. मॅटवर असणाऱ्या पंचांची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. माझ्या बाबतीतही असाच प्रकार तिसऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. शिवराज राक्षेने जी लाथ मारली ती चुकीची होती असं मी काल म्हटलं होते. परंतु जो पंच होता त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. १५-२० वर्षाची तपस्या करून तो महाराष्ट्र केसरीत तिसऱ्यांदा पोहचला होता. तुम्ही १० सेकंदात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली तरच पुढच्या काळात कुस्ती क्षेत्रात पंचांवर वचक बसेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच २००७, २००८ साली मी महाराष्ट्र केसरी झालो, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी लढवणारा मी ६० वर्षातला पहिला पैलवान होतो. माझ्याबाबतीही असेच घडले होते. माझ्या बाबतीत जे घडले त्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. तो विचार माझा चुकीचा होता. शिवराजनं खरेतर त्या पंचाला गोळी घालून कुस्ती क्षेत्राला संदेश दिला पाहिजे. या गोष्टीपासून पंचांनी लांब राहिले पाहिजे. ज्या प्रेक्षकांना कळत नाही त्यालाही ही कुस्ती बरोबर झाली नाही हे कळते. यात पृथ्वीराजची चूक नाही. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते अन्यायकारक आहे असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, गोळ्या घातल्या पाहिजे यासाठी म्हणतोय, कारण १५-२० वर्ष शिवराज राक्षे मेहनत घेतोय. आमचा दिवस पहाटे ३ वाजता सुरू होतो. सण उत्सव नाही, सुट्टी नाही. त्यातून तो इथपर्यंत पोहचतो. अशावेळी चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद व्हावं लागणे हे योग्य नाही असंही चंद्रहार पाटील यांनी सांगितले.