राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:31 IST2020-01-15T03:00:42+5:302020-01-15T06:31:59+5:30

६१ किलो वजनी गटातून खेळण्याची चूक पडू शकते भारी!

Rahul Aarey under Olympic dream? Disappointment of Maharashtra again | राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

स्वदेश घाणेकर

मुंबई : चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रच्या राहुल आवारेला डावलल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. ५७ किलो वजनी गटातून प्रबळ दावेदार असताना राहुलला डावलून हरयाणा लॉबीनं संदीप तोमरची निवड केली होती. या पाय खेचण्याच्या राजकारणाला शह देत राहुल नव्या दमाने उभा राहिला आणि २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागला. २०१६ ते २०२० या कालावधीत राहुलने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली. मात्र, त्याच्या एका निर्णयामुळे आता तोच ऑलिम्पिक प्रवेश अडचणीत सापडला आहे. राहुलचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात खेळण्याचा अतिआत्मविश्वास राहुलला नडला. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत राहुलने ५७ किलो वजनी गटातून सुवर्णपदकाची कमाई केली. ५७ किलो हा ऑलिम्पिक वजनी गट असल्यामुळे २०२०च्या स्पर्धेसाठी या गटातून राहुलची निवड पक्की होती. गतवर्षी कझाकस्तान येथे १४ ते २२ सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत पदकाची कमाई करून थेट ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याची राहुलला संधी होती, परंतु त्यानं या स्पर्धेत ५७ ऐवजी ६१ किलो वजनी गटातून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामागे भारताला पदक जिंकून देण्याचाच उद्देश होता आणि त्याने तो साध्यही केला. पण, याच स्पर्धेत ५७ किलो वजनी गटातून रवी कुमार दहीयाने स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याने या गटातून आॅलिम्पिकसाठीचा प्रवेशही निश्चित केला.

जागतिक स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्यानंतरही राहुलने ‘लोकमत’कडे बोलताना ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे सांगितले होते. पण, भारतीय कुस्ती महासंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या ऑलिम्पिक पात्रता गटासाठीच्या संघात ५७ किलो गटात रवीकुमारलाच संधी दिली. सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘रवीने ५७ किलो वजनी गटातून ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे तोच या गटातून आॅलिम्पिक स्पर्धेत खेळेल, राहुल आवारे नाही.’’ मात्र, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कसं आणि कोणत्या गटातून पूर्ण करणार याबाबत राहुलनं काहीच स्पष्ट सांगितले नाही.

जागतिक स्पर्धेच्या वेळी मी मांडलेलं गणित चुकलं. ५७ किलोच्या निवड चाचणीत मी अनेकदा रवी कुमारला पराभूत केले आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत तो पदकापर्यंत मजल मारेल, असे वाटले नव्हते. पण, त्याचं नशीब बलवत्तर होतं आणि त्यानं पदकासह ऑलिम्पिक पात्रताही निश्चित केली. माझं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न अजूनही भंगलेलं नाही. सध्या तरी वाट पाहणं माझ्या हातात आहे
- राहुल आवारे

Web Title: Rahul Aarey under Olympic dream? Disappointment of Maharashtra again