पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:54 IST2025-04-25T11:47:30+5:302025-04-25T11:54:47+5:30

Neeraj Chopra: पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला भारतात आमंत्रित केल्यामुळे नीरजला भारतीयांनी ट्रोल केले. याबाबत खंत व्यक्त करताना नीरज चोप्राने सोशल मीडियावर भलीमोठ पोस्ट लिहिली आहे

Neeraj Chopra Breaks Silence On Inviting Arshad Nadeem For NC Classic After Family Subjected To Hate | पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट

पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राला लोकांनी प्रचंड ट्रोल करण्यात आले. नीरज चोप्राने पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला भारतात आमंत्रित केल्यामुळे त्याला भारतीयांनी ट्रोल केले. याबाबत खंत व्यक्त करताना नीरज चोप्राने सोशल मीडियावर भलीमोठ पोस्ट लिहिली आहे. माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, हे पाहून वाईट वाटते, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

एनसी क्लासिक स्पर्धा पुढील महिन्याच्या २४ तारखेला बेंगळुरू येथे होणार आहे. भारतात होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स ए-लेव्हल स्पर्धेचे आयोजक म्हणून नीरजने जगभरातील अव्वल भालाफेकपटूंना आमंत्रित करण्याची जबाबदारी स्वीकारली. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. परंतु, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लोक संतप्त झाले आणि अर्शद नदीमला आमंत्रित केल्याबद्दल नीरजवर टीका होऊ लागली.लोकांनी त्याच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. याबाबत नीरज चोप्राने खंद व्यक्त केली.

नीरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी सहसा कमी बोलतो, पण याचा अर्थ असा नाही की, मी जे चुकीचे मानतो त्याविरुद्ध बोलणार नाही. विशेषतः जेव्हा माझ्या देशावरील प्रेम आणि माझ्या कुटुंबाच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न येतो. गेल्या ४८ तासांत जे काही घडले आहे, त्यानंतर अर्शदच्या एनसी क्लासिकमध्ये उपस्थितीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझा देश आणि त्याचे हित नेहमीच पहिले असतील. या हल्ल्यांत ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहेत, त्यांच्यासाठी शोक व्यक्त करतो. आपल्या देशासोबत घडले त्यामुळे मी दुखावलो आहे आणि संतापलो आहे. मला विश्वास आहे की आपल्या देशाच्या प्रतिसादातून एक राष्ट्र म्हणून आपली ताकद दिसून येईल आणि न्याय मिळेल.'

'मी इतक्या वर्षांपासून अभिमानाने देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, आता माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, हे पाहून मला दुःख वाटत आहे. लोक मला आणि माझ्या कुटुंबाला कोणतेही कारण नसताना लक्ष्य करत आहेत. अशा लोकांना मला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आम्ही साधे लोक आहोत. आमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू नये. अनेक माध्यमांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या सांगितल्या. पंरतु, मी बोलत नाही म्हणून त्या बातम्या खऱ्या असतील, असे होत नाही', असेही नीरज म्हणाला. 

Web Title: Neeraj Chopra Breaks Silence On Inviting Arshad Nadeem For NC Classic After Family Subjected To Hate