कर्नाटकची सामन्यावर मजबूत पकड
By Admin | Updated: March 20, 2015 02:10 IST2015-03-20T02:10:48+5:302015-03-20T02:10:48+5:30
करुण नायर (८०) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रणजी विजेत्या कर्नाटकने इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारली.

कर्नाटकची सामन्यावर मजबूत पकड
बंगळुरू : मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये आलेला मनिष पांड्ये (नाबाद ७३) आणि आर. समर्थ (८१) व करुण नायर (८०) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रणजी विजेत्या कर्नाटकने इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारली. कर्नाटककडे आता ३२१ धावांची भक्कम आघाडी असून सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजांनी शेष भारताची गोलंदाजी चांगल्याप्रकारे खेळून काढली. बिनबाद ३९ धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना कर्नाटकला लवकरच पहिला धक्का बसला. मयांक अगरवालला (२८) झेलबाद करून वरुण अॅरोनने आपला धडाका कायम राखला. यानंतर समर्थ आणि रेड्डी (३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यानंतर ठाकूर, अॅरोन आणि ओझा यांनी अचूक मारा करताना कर्नाटकला ठरावीक अंतराने धक्का देत त्यांची ४ बाद १८२ अशी कोंडी केली. समर्थने १५९ चेंडू खेळून काढताना १० चौकारांसह ८१ धावा फटकावल्या.
कर्नाटक अडचणीत सापडले असल्याचे दिसत असतानाच नायर आणि पांड्ये यांनी पाचव्या विकेटसाठी १०६ धावांची शतकी भागीदारी रचली. ही जोडी शेष भारताची डोकेदुखी ठरत असतानाच पुन्हा एकदा ओझाने निर्णायक कामगिरी करताना नायरची बहुमूल्य विकेट मिळवली. नायरने १२३ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांसह ८० धावांची संयमी खेळी केली. यानंतर आलेल्या श्रेयश गोपालला भोपळा फोडता न आल्याने कर्नाटकची ६ बाद २८९ धावा अशी अवस्था झाली.
मात्र संघाची स्थिती जाणून कर्णधार विनय कुमारने रणजी अंतिम सामन्यातील फलंदाजीची पुनरावृत्ती करताना पांड्येला उपयुक्त साथ दिली. पांड्ये आणि विनय यांनी दिवसभरात कर्नाटकला तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारून दिली.
शेष भारतकडून वरुण अॅरोन (२/८५) आणि प्रग्यान ओझा (२/९३) यांनी नियंत्रित मारा करताना कर्नाटकला रोखण्याचा प्रयत्न केला. तर रिषी धवन व शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.
संक्षिप्त धावफलक :
च्कर्नाटक (पहिला डाव) : सर्व बाद २४४ धावा.च्शेष भारत (पहिला डाव) : सर्व बाद २६४ धावा.च्कर्नाटक (दुसरा डाव) : समर्थ त्रि. गो. ठाकूर ८१, अगरवाल झे. जाधव गो. अॅरोन २८, रेड्डी पायचीत गो. ओझा ३१, उथप्पा त्रि. गो. अॅरोन ६, नायर पायचीत गो. अॅरोन ८०, पांड्ये खेळत आहे ७३, गोपाल झे. नमन ओझा गो. धवन ०, विनय खेळत आहे २८. अवांतर - १४. एकूण : ९३ षटकांत ६ बाद ३४१ धावा.
गोलंदाजी : धवन २१-१-७४-१; अॅरोन २०-२-८५-२; ठाकूर २१-४-६०-१; ओझा २६-३-९३-२; जाधव ४-०-१६-०; तिवारी १-०-६-०.