पुढील वर्षीचा आशिया कप बांगलादेशात : ठाकूर
By admin | Published: October 29, 2015 10:26 PM2015-10-29T22:26:55+5:302015-10-29T22:26:55+5:30
पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल
नवी दिल्ली : पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल, अशी माहिती बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर ठाकूर म्हणाले, ‘‘भारताने या बैठकीत ५० षटकांच्या स्पर्धेचे यजमानपद मागितले. सदस्य देशांनी सर्वानुमते बीसीसीआयची ही मागणी मान्य केली. भारतात पुढील वर्षी विश्वचषक टी-२० स्पर्धेचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा आशियाई देशांसाठी आशिया चषकाच्या तयारीसंदर्भात चांगले व्यासपीठ ठरेल. पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट शक्य नाही तर लंकेत मान्सून हंगाम असेल. यामुळे सदस्य देशांची सर्वोत्तम पसंती बांगलादेश होती.’
‘२०१८ चा वन डे आशिया चषक भारतात होणार असून २०१९ चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून या स्पर्धेची आम्ही मागणी केली.’ विशेष असे की एसीएच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. श्रीनिवासन यांच्या काळात आशियाई परिषद बंद होण्याच्या स्थितीत होती. या बैठकीला भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश या देशांनी नव्या देशांत क्रिकेटच्या विकासासाठी एकूण मिळकतीतील दोन टक्के अधिक वाटा एसीसीला देण्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था)