रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 17, 2025 06:21 IST2025-07-17T06:21:35+5:302025-07-17T06:21:46+5:30
खड्ड्यांमुळे वाढतेय प्राणहानी, नवी मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये दाखल गुन्ह्यात रस्त्यांवरील परिस्थिती दुर्लक्षित होताना दिसत आहे. बहुतांश अपघातांमध्ये केवळ रस्त्यांवरील परिस्थितीमुळे वाहनचालकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती पोलिसांच्या नोंदीवर येत नसल्याने मृत दुचाकीस्वार अथवा पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकावरच गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे अशा अपघातांच्या मुळाशी पोहोचून अपघाताला कारणीभूत परिस्थितीवरून संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
मूळ कारणाची पोलिसांकडून नोंद नाही
शहरात असे अनेक अपघात गतकाळात घडले आहेत, ज्यामध्ये दुचाकीस्वार पडण्याचे मूळ कारण पोलिसांच्या नोंदीवर आलेच नाही. त्यामुळे मृत दुचाकीस्वार किंवा पडल्यानंतर त्यांना पाठीमागून धडक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अर्ध्यात तपास गुंडाळले गेले आहेत. यामुळेच रस्त्यांवर अपघाताला कारणीभूत परिस्थिती निर्माण करूनही रस्त्यांच्या ठेकेदारांना कारवाईत अभय मिळताना दिसत आहे.
अनेक रस्ते सदोष
नवी मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अचानक समोर येणारे खड्डे, सांडलेली वाळू यांसोबतच डांबरामुळे झालेले चढउतारही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. परंतु, पोलिसांकडून केवळ मृत दुचाकीस्वारांना किंवा पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकांना दोषी धरले जाते. रस्त्यावरील परिस्थिती पोलिसांच्या नजरेतून का सुटते? त्यामागे ठेकेदार, प्रशासन व पोलिस यांचे साटेलोटे आहे का ? अशीही शंका उपस्थित होत आहे.
ठेकेदार, अधिकारी
येणार कचाट्यात
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात प्रतिवर्षी २५० ते ३०० व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावत असून अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. बहुतांश अपघातांमध्ये अपघाताचे मूळ कारण पडद्याआड राहून इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा प्राणांतिक अपघातांचा गंभीर गुन्ह्यांप्रमाणे तपास झाल्यास रस्त्यांचे ठेकेदार व संबंधित अधिकारी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात.
खड्ड्याने घेतले प्राण
गतवर्षी नांदगाव पुलावरील खड्ड्यात दुचाकीचा अपघात झाला होता. त्यात भायखळा येथील तरुणीचा मृत्यू झाला, तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. खड्ड्यात दुचाकी आदळून दोघेही पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने तरुणीला चिरडले होते. या गुन्ह्यातही पोलिसांनी खड्डा दुर्लक्षित करून ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल केला होता.
खड्डा चुकवताना अपघात
खड्डा चुकवण्यासाठी विद्यार्थ्याने दुचाकीचा ब्रेक दाबला आणि दुचाकी घसरून तो पडला. पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला चिरडले. नेरूळ येथील पुलावर २०२३ मध्ये ही दुर्घटना घडली होती. या प्रकरणी पाठीमागून धडक देणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला. मात्र खड्डा दुर्लक्षित झाला.
पूर्ण आढावा न घेताच गुन्हा दाखल
गतमहिन्यात महापालिकेचे एक कर्मचारी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर लटकणाऱ्या वायरमध्ये पाय अडकून पडले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र, दुचाकीस्वार पडण्यास कारणीभूत ठरलेली परिस्थिती पाहायला हवी होती. याही घटनेत अपघाताचे मूळ पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? अपघाताचा पूर्ण आढावा न घेताच गुन्हा दाखल केला का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.