अनधिकृत फेरीवाल्यांकडून पादचाऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:12 AM2019-11-17T00:12:03+5:302019-11-17T00:12:13+5:30

कारवाईकडे डोळेझाक; मुख्य रस्त्यांसह पदपथ बळकावले

Unauthorized pedestrians prevent pedestrians | अनधिकृत फेरीवाल्यांकडून पादचाऱ्यांची अडवणूक

अनधिकृत फेरीवाल्यांकडून पादचाऱ्यांची अडवणूक

Next

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी, त्यांच्याकडून रहदारीच्या मुख्य रस्त्यांसह पदपथ बळकावले जात आहेत. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांसह वाहनचालकांना करावा लागत असून, वाहतूककोंडीतही भर पडत चालली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून शहराला सोडवण्यात पालिका अधिकारी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उद्भवत असलेल्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचीही डोळेझाक होत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते. शिवाय, पदपथ व रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने रहदारीचीही वाट मोकळी झाली होती; परंतु त्यांच्या बदलीनंतर मागील अडीच वर्षांत त्यांनी बसवलेली घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. जागोजागी फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे दिसत असून, पदपथ व रस्तेही बळकावले जात आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांमागे अनेक टोळ्या सक्रिय असून, त्यांना पालिका अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचाही छुपा पाठिंबा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज दाबला जात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत चालले असून, त्यांच्यातल्या गुंडगिरी प्रवृत्तीचेही दर्शन जागोजागी घडत आहे.

पदपथ व रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकान मांडल्याची तक्रार केल्यास संबंधिताला थेट धमकावलेही जात आहे, असे अनेक प्रकार वाशी व ऐरोलीसह घणसोली परिसरात घडले आहेत. त्यामुळे नागरिकांवर फेरीवाल्यांची दहशत निर्माण होत चालली आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाशी सेक्टर-९ व लगतचा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला होता. तर जे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत होते, त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून दिली होती; परंतु मागील काही वर्षांत वाशी सेक्टर ९, १५ व इतर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यांच्याकडून पदपथांवरच बाजार मांडला जात असल्याने पादचाºयांना नाइलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये अपघाताचाही धोका निर्माण होत आहे. तर त्याच परिसरात रस्त्यालगत मोठ्या संख्येने वाहनेही उभी केली जात असल्याने वर्दळीच्या वेळी अग्निशमन केंद्र ते जुहूगाव दरम्यान मोठी वाहतूककोंडी होत आहे. यामुळे वाहनांपासून होणाºया प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मार्जिनल स्पेसवरील कारवाईतही पालिकेने हात आखडता घेतल्याने प्रशासनाच्याच भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. तर पालिकेकडूनच अभय मिळत असल्याने व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानापुढील जागेतही छोटी दुकाने थाटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पार्किंगचाही फटका
शहरात अनेक छोटी-मोठी वाहन विक्री केंद्र असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे रस्त्यालगतच आहेत. त्यांच्याकडून विक्रीसाठी असलेली वाहने पदपथांवरच मांडली जात आहेत. त्याशिवाय टुरिस्ट कंपन्यांचीही वाहने रस्त्यालगत तसेच पदपथांवर उभी केली जात आहेत. यामुळेही रहदारीला अडथळा होत असून त्यावरही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. फेरीवाल्यांसह अशा अतिक्रमणावर कारवाईला मिळणाºया अभयामागे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा आरोप होत आहे.

ना फेरीवाला क्षेत्रातही अतिक्रमण
रेल्वेस्थानक, रुग्णालये तसेच शाळा व इतर महत्त्वाच्या ठिकाणाबाहेर १५० मीटरपर्यंत ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनधिकृत फेरीवाल्यांना थारा मिळू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. यानंतरही अशा ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून प्रशासनाकडूनच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होताना दिसून येत आहे; परंतु सर्वच राजकीय पक्षांकडूनही अर्थपूर्ण मौन बाळगले जात आहे.

स्टेशन परिसरातही बाजार
रेल्वेस्थानकांच्या आवारातही अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. वाशी, सानपाडा, ऐरोली तसेच नेरुळ व जुईनगर स्थानकाबाहेर हा प्रकार पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गाळ्यातील दुकानदारांसह अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रवाशांची वाट अडवण्यात आली आहे. त्यांच्यावरही कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वच प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Unauthorized pedestrians prevent pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.