राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
By नारायण जाधव | Updated: May 31, 2025 07:36 IST2025-05-31T07:35:54+5:302025-05-31T07:36:40+5:30
वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ

राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
नारायण जाधव
नवी मुंबई : राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आपल्या विविध विभागांच्या मालकीची २१,४२५ वाहने भंगारात काढली आहेत. यातील १२,८२३ वाहने १ एप्रिल २०२४ ते २१ एप्रिल २०२५ या काळात भंगारात काढली आहेत. उर्वरित ७,८७९ ही १ एप्रिल २०२४ पूर्वी भंगारात काढल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, नव्याने ९४६ वाहने विभागाच्या पोर्टलवर भंगारासाठी लिलावात काढली.
केंद्र सरकारच्या मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम २०२१ अनुसार ही वाहने निष्कासित केल्याची माहिती परितटन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात दिली. भविष्यात वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर नवी वाहने खरेदी करण्याची मुभा दिल्याने अर्थव्यवस्थेत चालना मिळेल, असे शासनाने म्हटले आहे.
जुनी वाहने भंगारात का?
राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे.
रस्त्यावरील प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे.
वाहनांची इंधन कार्यक्षमतेत सुधारणा करून देखभाल खर्च कमी करणे.
जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणून अर्थव्यवस्थेत गुणात्मक सुधारणा करणे.
खरेदी करण्यासाठी मुभा
१५ वर्षे किंवा त्याहून जुनी जी शासकीय वाहने भंगारात काढून त्यांचा लिलाव केला आहे, त्यामुळे त्यांच्याअभावी अधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये, शासकीय कामे खोळंबू नये, हे लक्षात घेऊन या वाहनांच्या जागी भाड्याने घेण्याची वा नवी वाहने खरेदी करण्याची मुभा संबंधितांना दिली आहे.
कोणाची किती वाहने ?
केंद्र शासन १,१४६
राज्य शासन ५,२११
पोलिस ६,४६६