शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:08 IST2022-05-24T11:56:31+5:302022-05-24T12:08:13+5:30

उत्पादन घटल्याने भाव वाढले

Tomatoes reached hundreds in the retail market | शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला

शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला

नामदेव मोरे

नवी मुंबई : देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर ४० ते ८० रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव ९० ते १०० रुपये झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांनाही महाराष्ट्रातून टोमॅटो पुरविला जात आहे.          

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्यांमध्ये टोमॅटोचाही समावेश हाेतो. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते; परंतु पंधरा दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविला जात आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.     
मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापूर्वी १४ ते २२ रुपये किलो दराने टाेमॅटो विकला जात होता. एक आठवड्यापूर्वी हे दर २५ ते ६० रुपये झाले व सोमवारी बाजारभाव ४० ते ८० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ९० ते १०० रुपये दराने टोमॅटोची विक्री हाेत असून, त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tomatoes reached hundreds in the retail market