गुढीपाडव्याचा गोडवा फिका; आंब्याची आवक यंदाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:19 IST2026-03-20T13:19:12+5:302026-03-20T13:19:27+5:30
खराब हवामानाचा फटका; फक्त २४ हजार पेट्या आल्या; सलग तिसऱ्या वर्षी घसरण

गुढीपाडव्याचा गोडवा फिका; आंब्याची आवक यंदाही कमी
नवी मुंबई : खराब हवामानाचा फटका बसल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभरात अवघ्या २४ हजार ८०० पेट्यांची आवक झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत ती जवळपास निम्म्यावर आली आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी आवक घसरल्याचे चित्र आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुढीपाडव्याचा मुहूर्त आंबा हंगामासाठी महत्त्वाचा मानला जातो. २०२४ मध्ये या दिवशी तब्बल ९१ हजार पेट्यांची आवक झाली होती, तर २०२५ मध्ये ती ५० हजारांवर घसरली. यंदा ती आणखी घटून २४,८०० पेट्यांवर आली आहे. यामध्ये कोकणातून १३,९२५ पेट्या, तर इतर राज्यांतून १०,८७५ पेट्यांचा समावेश आहे. आवक घटल्याने दरही चढेच राहिले आहेत. बाजार समितीत हापूस आंब्याला १,००० ते १,८०० रुपये दर मिळत असून, किरकोळ बाजारात तो १,५०० ते ३,००० रुपये डझन दराने विकला जात आहे. इतर आंब्यांचे दर ८० ते ४०० रुपये किलो (घाऊक) आणि १२० ते ६०० रुपये किलो (किरकोळ)
असे आहेत.
रेडीमेड आमरसाला नागरिकांची पसंती
आवक कमी आणि दर जास्त असल्याने यंदा अनेक नागरिकांनी घरी आमरस करण्याऐवजी रेडीमेड आमरसाला पसंती दिल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांच्या मते, एप्रिलच्या सुरुवातीपासून आवक वाढण्याची शक्यता असून, संपूर्ण महिनाभर बाजारात समाधानकारक पुरवठा होईल.