हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:31 IST2025-05-02T15:30:39+5:302025-05-02T15:31:45+5:30

Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: अनेक तास बेशुद्धावस्थेत होतो. स्थानिकांनी मला तेथून बाहेर काढले. लष्करांच्या जवानांनी प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचार सुरू होते, असे या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या सुबोध पाटील यांनी सांगितले.

subodh patil of navi mumbai maharashtra share his thrilling experience after survivor of the pahalgam terror attack | हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव

हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव

Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढलेला असतानाच जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या रात्रीपासून म्हणजेच २४ एप्रिलपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे, अशी माहिती जम्मू येथील संरक्षण प्रवक्त्यांनी दिली. यातच नवी मुंबईत राहणारे सुबोध पाटील या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सुखरूप घरी परतलेल्या सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक अनुभव सांगितला. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि हल्ल्यानंतर कुठल्या मार्गाने पळ काढला, याचा शोध घेतला जात आहे. अगदी मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या सुबोध पाटील यांनी अंगावर काटा आणणारा अनुभव कथन केला. 

नवी मुंबईच्या सुबोध पाटील यांनी सांगितला थरारक अनुभव

पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या नवी मुंबईतील निवासस्थानी परतले. पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा अनुभव कथन केला. मीडियाशी बोलताना सुबोध पाटील यांनी सांगितले की, मागून कसला तरी आवाज येत होता. परंतु, नेमके काय सुरू आहे, ते कळत नव्हते. तो आवाज सलगपणे सुरूच होता आणि तेथे उपस्थित असलेले लोक सैरावैरा पळत होते. आम्हीही अत्यंत घाबरलो आणि वाट मिळेल, तिथे पळू लागलो. काही अंतर गेल्यावर समोरच काही लोक बसलेले दिसले. त्यामुळे आम्हीही तिथे बसलो. तेवढ्यात एक दहशतवादी तेथे आला आणि म्हणाला की, तुमच्यापैकी जे हिंदू आहेत, त्यांनी उभे राहा. असे सांगताच त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यातील गोळ्या मला लागून मी खाली पडलो. अनेक तासांनी शुद्ध आली, तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडलेले पाहिले. ज्या स्थानिकाने मला त्या बैसरन खोऱ्यात नेले होते, त्याने मला ओळखले. त्याने मला प्यायला पाणी दिले आणि पाठीवर घेऊन मला तिथून बाहेर काढले. तेथून बाइकवरून खाली घेऊन आला. लष्कराच्या जवानांनी माझ्यावर प्राथमिक उपचार केले आणि रुग्णालयात दाखल केले. तिथून मला हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे सात दिवस माझ्यावर उपचार सुरू होते, असे सुबोध पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प आहे. जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या की, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. या देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

Web Title: subodh patil of navi mumbai maharashtra share his thrilling experience after survivor of the pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.