जाळी-शिसे महाग; मच्छीमार संकटात; खर्चही वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:25 IST2026-03-13T08:25:19+5:302026-03-13T08:25:45+5:30
आखातातील तणावपूर्ण परिस्थितीचा फटका मच्छीमारांनाही बसू लागला आहे.

जाळी-शिसे महाग; मच्छीमार संकटात; खर्चही वाढला
उरण : आखातातील तणावपूर्ण परिस्थितीचा फटका मच्छीमारांनाही बसू लागला आहे. चीनसह आखाती देशांतून आयात होणाऱ्या मासेमारीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने जाळी, शिसे आणि इतर साहित्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.
मासेमारीसाठी जाळी, नायलॉन धागा (यान), शिसे, दोऱ्या आणि इतर अनेक साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या वस्तूंपैकी बहुतांश साहित्य चीन व आखाती देशांतून आयात केले जाते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक धोक्यात आली असून, अनेक शिपिंग कंपन्यांनी आखातातील मालवाहतूक कमी केली किंवा थांबविली आहे. त्यामुळे कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने त्याचे दर वाढले आहेत.
पर्ससीन मासेमारी बोटीला सहा टन जाळी आणि दोन टन शिसे लागते. तसेच जाळीसाठी लागणारे नायलॉन सूत (यान) व इतर साहित्याचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. युद्धामुळे या सर्व वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत.
दरात ६० रुपयांची वाढ
पूर्वी जाळीचा दर प्रति किलो सुमारे ४२० रुपये होता. आता त्यामध्ये किलोमागे सुमारे ६० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच शिसे पूर्वी २१० रुपये प्रति किलो दराने मिळत होते; त्यामध्ये आता ४० रुपयांची वाढ झाली आहे.
‘मासेमारीसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीन व आखातातून येतो. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून, जाळी, शिसे आणि इतर साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत. परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रमेश नाखवा, सचिव, वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशन