दुबईत अडकून पडले नवी मुंबईकर दाम्पत्य
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 2, 2026 04:44 IST2026-03-02T04:44:47+5:302026-03-02T04:44:59+5:30
- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांना बसत आहे. ...

दुबईत अडकून पडले नवी मुंबईकर दाम्पत्य
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांना बसत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी दुबई येथे गेलेले अनेक भारतीय अडकून पडले असून, त्यांमध्ये नवी मुंबईतील नवविवाहित दाम्पत्याचाही समावेश आहे.
नेरूळमध्ये राहणारे विजेंद्र म्हात्रे (३१) आणि पूनम (२६) लग्नानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहलीसाठी दुबईला गेले होते. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान दुबईतील पर्यटनाचा आनंद घेतला; मात्र परतीच्या दिवशी त्यांचा आनंद क्षणात चिंतेत बदलला. विमानतळावर पोहोचताच ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाल्याने सर्व उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आणि त्यांना परत हॉटेलमध्ये जावे लागले.
अनपेक्षित मुक्काम वाढल्याने म्हात्रे दाम्पत्यावर आर्थिक ताणही वाढला आहे. मुंबईला परतण्यासाठी त्यांनी वारंवार तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न केला; मात्र उड्डाणे रद्द झाल्याने पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरत आहे. दरम्यान, दुबईत राहणारे नवी मुंबईकर हरीश गौडा यांनी सांगितले की, ‘परिस्थिती तणावपूर्ण असली तरी स्थानिक प्रशासन सतर्क आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षित आहेत.’
सतर्कतेचे आवाहन
युद्धाचे सावट वाढताच दुबई प्रशासनाने नागरिकांना मोबाइल संदेशाद्वारे सतर्क केले असून पुढील सूचना मिळेपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
दुबईत स्थायिक असलेले नवी मुंबईकर शहाजी माळी यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील अर्धसत्य व्हिडीओंमुळे भारतातील नातेवाइकांमध्ये अनावश्यक भीती पसरत आहे.