महापालिका, सिडको अधिकाऱ्यांना घेतले फैलावर; गणेश नाईक को गुस्सा क्यो आता है?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 05:51 IST2025-02-10T05:51:01+5:302025-02-10T05:51:25+5:30
सिडको नगरविकास खात्याच्या अखत्यारित असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने सिडकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधल्याचे सांगण्यात येत आहे. यातून गणेश नाईक को गुस्सा क्यों आता है याची चर्चा होऊ लागली आहे.

महापालिका, सिडको अधिकाऱ्यांना घेतले फैलावर; गणेश नाईक को गुस्सा क्यो आता है?
नारायण जाधव
उपवृत्तसंपादक
नवी मुंबईचे सर्वेसर्वा असलेले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच ॲक्टिव्ह झाले आहेत. आपण पालघरच नव्हे तर ठाणे आणि नवी मुंबईतही जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माहेरघर असल्याने गणेश नाईक यांच्या घोषणेने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. घोषणेवरच न थांबता नवी मुंबईत तब्बल दहा वर्षांनंतर नाईक यांनी जनता दरबार घेतला. यापूर्वी संयुक्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर तसेच पालघरमध्ये जनता दरबार घेऊन अनेकांच्या समस्या सोडविल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून एमआयडीसी, सिडको वा नवी मुंबई महापालिकेत अनेक गैरप्रकार नाईक यांनी महिन्यातून दोनदा आयुक्तांची भेट घेऊन निर्दशनास आणले. मात्र, सत्ता हाती नसल्याने अधिकारी आपल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात असा त्यांचा समज होता. आता सत्तासोपानावर आरूढ होताच त्यांनी पहिल्याच जनता दरबारात नेहमीच्या शैलीत एमआयडीसी, महापालिका, सिडको अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सिडको नगरविकास खात्याच्या अखत्यारित असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने सिडकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधल्याचे सांगण्यात येत आहे. यातून गणेश नाईक को गुस्सा क्यों आता है याची चर्चा होऊ लागली आहे.
नवी मुंबईतील मोक्याचे सामाजिक सुविधांचे भूखंड विक्रीचे प्रकरण असो किंवा पाम बीच मार्गावरील पाणथळीच्या जागांवर महापालिकेने निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केल्याचा विषय असो. नवी मुंबई म्हणजे मुंबईतील डेब्रिज टाकण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे. सिडको अधूनमधून डेब्रिज माफियांवर कारवाई करीत असली तरी ते कोठून आले, कोणाच्या साईटवरून अन् कोणाच्या मालकीच्या डम्परमधून आले, याचा शोध घेऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत. डम्पर चालकांवर गुन्हे दाखल करून प्रश्न मिटणार नाही. अनधिकृत बांधकामांवर जेसीबीचे चारदोन टोचे मारून किरकोळ कारवाई का होते? अनधिकृत बांधकामांचे आगर असलेल्या बोनकोडेसह घणसोली-गोठीवलीत सर्वात कमी अनधिकृत बांधकामे दाखविण्याचा चमत्कार कसा घडला, पुनर्विकासासह एमआयडीसीत चाैरस मीटरमागे लाखो रुपयांची बिदागी कोण वसूल करतो, याचा शोध त्यांनी घेतला पाहिजे.