५० किलो मर्यादेवर माथाडी ठाम; कांदा-बटाटा बाजार ठप्प, नियम विरुद्ध व्यवहार; तोडगा न निघाल्याने ‘एपीएमसी’त वाढला तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:38 IST2026-03-05T04:38:18+5:302026-03-05T04:38:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास ...

५० किलो मर्यादेवर माथाडी ठाम; कांदा-बटाटा बाजार ठप्प, नियम विरुद्ध व्यवहार; तोडगा न निघाल्याने ‘एपीएमसी’त वाढला तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास माथाडी कामगारांनी बुधवारी नकार दिला. परिणामी, सुमारे ३० ट्रकमधील माल उतरू शकला नाही. प्रश्न निकाली काढण्यासाठीच्या बैठकीतही तोडगा न निघाल्याने बाजारातील तणाव अधिकच वाढला.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने नियमाप्रमाणे कृषीमालाच्या गोणीचे वजन कमाल ५० किलो असावे, अशी मागणी लावून धरली आहे. यापूर्वी आंदोलन करूनही प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, बाजारात ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची आवक सुरूच असल्याचा आरोप संघटनेने केला. त्यामुळे १ मार्चपासून जादा वजनाच्या गोण्या न उचलण्याचा इशारा दिला होता. ५० किलोपर्यंत वजन असलेल्या गोण्या उतरवल्या; मात्र जादा वजनाच्या गोण्या हाताळण्यास नकार दिला.
व्यापारावर परिणाम
गुरुवारीही जादा वजनाच्या गोण्यांची आवक सुरू राहिल्यास व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...म्हणून तोडगा नाही
बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील तसेच मुकादम उपस्थित होते. संचालक अशोक वाळुंज आदी बैठकीला हजर होते. मात्र, माथाडी संघटना ५० किलो मर्यादेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही.
‘त्या’ गोण्या उचलणार नाही
‘कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने ५० किलो हीच कमाल मर्यादा असली पाहिजे. दोन वर्षे पाठपुरावा करूनही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे जादा वजनाच्या गोण्या कोणत्याही परिस्थितीत उचलल्या जाणार नाहीत,’ असे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
‘देशभरातून येथे माल येतो. कामगारांच्या भूमिकेवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली; मात्र संघटना त्यांच्या निर्णयावर ठाम आहे,’ असे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले.