"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

By नामदेव मोरे | Updated: February 7, 2024 18:46 IST2024-02-07T18:45:57+5:302024-02-07T18:46:31+5:30

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार : प्रत्येक आमदाराला निवेदन देण्याचे मराठा समाजाला आवाहन

Maratha Reservation: "The hunger strike will continue until Ordinance is converted into law" Manoj Jarange Patil | "सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

नवी मुंबई : राज्यातील कुणबी नोंदी ५७ लाखावरून ६२ लाखांवर पोहचल्या आहेत. सगेसोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अद्यादेश सरकारने दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला निवेदन द्या. सर्वांच्या सहमतीने सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे. १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही. समाजासाठी बलीदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर दिलेल्या धडकेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. राज्यात ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. आता हाच आकडा ६२ लाखांवर पोहचला आहे. ३९ लाख नागरिकांना प्रत्यक्षात दाखल्यांचे वाटप केले आहे. सगे सोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अद्यादेश आपल्याला दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत आपला लढा सुरूच राहिल.

आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठ्यांनी अभुतपूर्व एकजूट दाखविली आहे. राज्यातील सकल मराठा समाजाने आपल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, निवेदन देवून सगेसोयऱ्याच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करावे. सर्वमताने हा निर्णय झाला पाहिजे. मी स्वत: १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत आहे. कायद्यात रूपांतर होईपर्यंत माघार घेणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या वेशीवर धडक दिल्यानंतर काहींना पोटदुखी सुरू झाली आहे. दुर्दैवाने आपल्या समाजातीलही काही जण आहेत. आता हेवेदावे बाजूला ठेवा आरक्षणाची निखराची लढाई सुरू आहे सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आंदोलनात नवी मुंबईकरांनी केलेल्या सहकार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

आरक्षण भेटू द्या त्याच्यात किती दम आहे पाहतो
छगन भुजबळ यांच्यावरही नाव न घेता टिका केली. मराठ्यांचे सर्वाधीक नुकसान त्याने केले. ओबीसी नेता म्हणवितो व गोर गरीबांचे नुकसान करतो. त्याच्या सारखा जातीयवादी माणूस पाहिला नाही. ज्या पक्षात जातो तो पक्षच तोडतो. एकदा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू द्या त्याच्यात किती दम आहे तेच पाहतो असा इशाराही त्यांनी दिला.

...तर मंडल आयोगाला आव्हान देणारच
मंडल आयोगाला आव्हान देतो असे म्हटल्याने अनेकांना घाम फुटला. पण आम्ही कोणाचे नुकसान करणार नाही. मराठा ओबीसी वाद आम्ही होऊ देणार नाही. पण गोरगरीब मराठ्यांचे नुकसान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Maratha Reservation: "The hunger strike will continue until Ordinance is converted into law" Manoj Jarange Patil