बहुचर्चित ई-स्पीड बोट सेवेचे कंत्राट जेएनपीए रद्द करणार! देखभालीसाठी माझगाव डॉक कंपनीबराेबरच ३८ कोटी खर्चाची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 05:45 IST2026-02-18T05:41:10+5:302026-02-18T05:45:01+5:30
उरण-नेरूळ रेल्वेमुळे जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. त्यामुळे जेएनपी प्राधिकरणाला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील लाकडी प्रवासी बोट सेवेचा खर्च परवडेनासा झाला आहे.

बहुचर्चित ई-स्पीड बोट सेवेचे कंत्राट जेएनपीए रद्द करणार! देखभालीसाठी माझगाव डॉक कंपनीबराेबरच ३८ कोटी खर्चाची तरतूद
मधुकर ठाकूर
लाेकमत न्यूज नेटवर्क
उरण : वर्षभरापासून आश्वासनांच्याच हिंदोळ्यावर हेलकावे खाणारी जेएनपीएची बहुचर्चित ई-स्पीड बोट सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या आणि टीकेचे धनी ठरलेल्या जेएनपीएने माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीच्या कामाचे कंत्राट आणि ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
उरण-नेरूळ रेल्वेमुळे जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. त्यामुळे जेएनपी प्राधिकरणाला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील लाकडी प्रवासी बोट सेवेचा खर्च परवडेनासा झाला आहे. तसेच प्रवासी वाहतूकसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटीही खर्चीक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त नसल्याचे जेएनपीएचे माजी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला होता.
वर्षभरापासून रखडली सेवा
दहा वर्ष ई-स्पीडबोटींची सेवा पुरवण्यासाठी जेएनपीएने ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही केली आहे.
उन्हाळी हंगामात २०-२५ प्रवासी व पावसाळी हंगामात
१०-१२ क्षमतेच्या दोन स्पीडबोट बोटी फेब्रुवारी २०२५ पासूनच प्रवासी वाहतुकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा जेएनपीएने केली होती.
मात्र, स्पीडबोटींचा वेग, प्रवासी वाहतुकीची क्षमता, तांत्रिक अडचणी आणि वारंवार करण्यात आलेल्या चाचण्यानंंतरही वर्षभरापासून ई-स्पीडबोट सेवा सुरूच झालेली नाही.
बंदराच्या कामकाजासाठी सेवा उपयुक्त
सागरी ई- स्पीडबोट सेवा बंदरात कामकाजासाठी मुंबईतून ये-जा करणाऱ्या शेकडो जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी होती.
यामुळे प्रवासातील वेळही वाचणार हाेता. मात्र, गत फेब्रुवारीमध्ये सुरू होणारी ई-स्पीड बोटसेवा वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप सुरू झालेली नाही.
तासाभराचा प्रवास अगदी ३५-४० मिनिटांतच होणाऱ्या ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला होता. प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या दोन ई-स्पीडबोटींचे कंत्राट माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते.