महामार्गाविषयी अहवाल शासनाकडे

By Admin | Updated: July 6, 2017 06:52 IST2017-07-06T06:52:34+5:302017-07-06T06:52:34+5:30

सायन - पनवेल महामार्गाची कामे अर्धवट असल्याने व खड्डे न बुजविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जीवित व वित्त हानीसह

The government report about the highway | महामार्गाविषयी अहवाल शासनाकडे

महामार्गाविषयी अहवाल शासनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गाची कामे अर्धवट असल्याने व खड्डे न बुजविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जीवित व वित्त हानीसह वारंवार वाहतूककोंडी होत आहे. या समस्येला पूर्णपणे एसपीटीपीएल कंपनी जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराबरोबरच्या अटी व शर्तींची छाननी करावी. शर्तींचा भंग करण्यात आला असल्यास एसपीटीपीएलविरोधात कायदेशीर तक्रार देण्याविषयी सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अधिकाऱ्यांना दिली असून महामार्गाच्या दुरवस्थेविषयी सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महामार्गावर वारंवार होणारे अपघात व वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत नगराळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, एसपीटीपीएल कंपनी, सिडको व वाहतूक पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक पोलीस मुख्यालयामध्ये आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी वाशी ते कळंबोलीपर्यंतच्या महामार्गाच्या स्थितीविषयी सचित्र सादरीकरण केले. वाशी गाव, वाशी प्लाझा, सानपाडा ब्रिज, तुर्भे ब्रिज, शरयू मोटार्स, शिरवणे ब्रिजच्या वरील व खालील रस्ता, उरण फाटा ब्रिज, सीबीडी ब्रिजखालील सर्कल, मेट्रोब्रिजखालील रस्ता, कोपरा ब्रिज, पुरुषार्थ ब्रिज, कळंबोली सर्कल येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. खड्ड्यांची छायाचित्रेही बैठकीमध्ये दाखविण्यात आली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग व सायन - पनवेल टोलवेज कंपनीबरोबर केलेल्या पत्रव्यवहाराविषयी माहिती दिली. वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याच आस्थापनेने योग्य दखल घेतली नाही. परिणामी वाहन चालकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले आहे. वारंवार वाहतूककोंडी व अपघात झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमांशू श्रीमल यांनी एसपीटीपीएल कंपनीबरोबर २०११ मध्ये १७ वर्षे व ५ महिन्यांसाठी करार झाला आहे. कराराप्रमाणे संपूर्ण रोडची देखभाल, हायमास्ट, पथदिवे, बसविणे व दुरुस्त करणे, सिग्नल यंत्रणा व ब्लिंकर बसविणे, पादचारी व भुयारी मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. गतवर्षीही त्यांनी दुरुस्तीची कामे केली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेवून कामे केली, पण त्यांची बिले कंपनीने दिलेली नाहीत. यावर्षी नालेसफाईही केलेली नसल्याने बांधकाम विभागाने १५ दिवसांपूर्वी कामे हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. खड्डे बुजविण्याचे कामही सुरू केले आहे. ठेकेदार कंपनी देखभाल दुरुस्तीची कामे करत नसल्याने खारघर टोलवर होणारी वसुली पूर्णपणे थांबविण्यात यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फैलावर घेतले. महामार्गाच्या समस्येला ठेकेदारच जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अटी शर्तींची छाननी करून संबंधितांविरोधात तक्रार देण्याची सूचना त्यांनी बैठकीत केली.

सिग्नल यंत्रणा व ब्लिंकर
सानपाडा,एलपी, तुर्भे पुलाखालील सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात यावी. महामार्गावरील उड्डाणपूल व इतर अत्यावश्यक ठिकाणी ब्लिंकर्सची आवश्यकता असल्याचे यावेळी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
पादचारी व भुयारी मार्ग
महामार्गावरील वाशी गाव, तुर्भे शरयू मोटर्स, कामोठे येथे पादचारी पुलाची आवश्यकता आहे. सानपाडा, एलपी पूल, एसबीआय कॉलनी, उरण फाटा, खारघर हिरानंदानी चौक, पुरुषार्थ पूल व कामोठे येथील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
कामोठे रोड विस्तारीकरण
कामोठेमध्ये विस्तारीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. यासाठी मँग्रोज सेलची परवानगी मिळण्यासाठी अलिबाग कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांनी सुचविलेल्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास कळविले.

अपघात टाळण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना
१जुईनगर, श्री दत्त मंदिर, शरयू मोटर्स, शिरवणे, एलपी उड्डाणपूल, कोपरा, कळंबोली ते कामोठे दरम्यान दुभाजकावर बॅरिकेटिंग, रेलिंग करण्यात यावे.
२आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन, लेन मार्किंग, रिफ्लेक्टर्स, कॅट आईज, माहिती व दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत.
३अपघातवेळी घटनास्थळी तत्काळ मदत पोहचविण्यासाठी महामार्गावर गस्ती वाहन, रुग्णवाहिका,हायड्रो टोविंग व्हॅन उपलब्ध करून देणे
४वाशी ते कळंबोली सर्कल दरम्यान दोन्ही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

नाल्यांची कामे पूर्ण करा
नाल्यांची कामे करण्यात आलेली नाहीत. यामुळे वाशी, तुर्भे, सीबीडी, खारघर व कळंबोली वाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या रोडवर पाणी साचत आहे.

टोल वसुली थांबविण्याची शिफारस
सायन - पनवेल महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे एसपीटीपीएल कंपनीची आहे. गतवर्षीही त्यांनी खड्डे बुजविले नाहीत व बांधकाम विभागाने केलेल्या खर्चाची बिलेही दिली नाहीत.
यावर्षीही दुरुस्तीची कामे केली नाहीत. अखेर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे सुरु केली असून निष्काळजीपणा करणाऱ्या एसपीटीपीएलकडून होणारी टोल वसुली थांबविण्यात यावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पथदिवे दुरुस्ती
महामार्गावरील पथदिवे व हायमास्ट तत्काळ सुरू करण्याची मागणी पोलीस प्रशासनाने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जबाबदारीही एसपीटीपीएल कंपनीची असल्याचे सांगितले. परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद
पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये ‘लोकमत’च्या वृत्तांचेही पडसाद उमटले. बैठकीमध्ये दाखविण्यात आलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये खड्डेमय महामार्ग, महामार्ग अंधारात, पोलिसांवरील ताण वाढला, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष या वृत्तांची कात्रणे दाखविण्यात आली. ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली.

Web Title: The government report about the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.