मोबाइलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर, ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम, हस्ताक्षराची लय, गती हरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:50 AM2021-03-30T00:50:04+5:302021-03-30T00:50:49+5:30

side effects of online learning : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे.

Fingers moving on mobile screen, forgetting to write, side effects of online learning, signature rhythm, lost speed | मोबाइलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर, ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम, हस्ताक्षराची लय, गती हरवली

मोबाइलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर, ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम, हस्ताक्षराची लय, गती हरवली

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे. मोबाइलवर फिरणाऱ्या बोटांना लेखणीचा विसर पडला आहे. परीक्षा जवळ आली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची लय व गती हरवल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. (Fingers moving on mobile screen, forgetting to write, side effects of online learning, signature rhythm, lost speed)

शैक्षणिक आयुष्यात सुंदर हस्ताक्षराला खूप महत्त्व आहे. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे यासाठी शिक्षक आणि पालकांचा कटाक्ष असतो. तर त्यासाठी लहानपणापासून सराव करून घेतला जातो. अक्षर तसेच लिहिण्यासाठी लागणारा वेग हे दहावी, बारावीसाठी खूप महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शिक्षण प्रणालीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागल्याने मुलांचे लिखाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. शिकवताना रनिंग नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने हातांच्या बोटांना लेखणीचा सराव कमी होत गेला. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या वेळेत उत्तरपत्रिका सोडविणे मुश्कील होईल याची चिंता पालकांना सतावत आहे. 

मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात 
वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. कोरोना काळात मुलांचे बिघडलेले अक्षर तसेच लिखाणाची गती वाढविण्यासाठी नियमित शुद्धलेखनाचा सराव करणे खूप गरजेचे आहे. ऑनलाइनमुळे मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालविण्यासाठी लेखन सराव योग्य राहील.
 संजय खटके, शिक्षक 

लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाइनमुळे कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण, यातूनही स्वाध्याय मुलांना दिला जातो. तो सोडवून घेण्यासाठी शिक्षक तसेच पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. मुलांकडून सराव करून घेतल्याने हस्ताक्षर चांगले येते. आम्हीदेखील मुलांना लिहिण्याची आवड निर्माण करतो.
 खुशी सावर्डे, शिक्षिका 

विद्यार्थ्यांनो, हे करा!
दररोज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील वहीचे एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपेपर सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न - उत्तरे सोडवावीत. म्हणजे गती वाढते.
एकदम लिखाण न करता काही दिवस ठरावीक आणि मोजकेच लिखाण करावे, परंतु लिखाणात सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे.
पालकांनी आपल्या पाल्याच्या लिखाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे. त्यांना त्यासाठी मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीदेखील वाढेल. 

पालकांचे मत… 
ऑनलाइन शिक्षणामुळे गत वर्षापासून मुले केवळ ऐकत आहेत. लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी झाला आहे. त्यामुळे मुले लिखाणाला कंटाळली आहेत. याचा परिणाम मुलांच्या हस्ताक्षरावर झाला आहे.
- नीलम आंधळे, पालक 

मोबाइलमुळे लेखन थांबले आहे. शिक्षकांचा प्रत्यक्ष दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. त्यात लिखाण कमी झाल्याने हस्ताक्षर खराब येत आहे. घरीच सराव करून घेत असल्याने यात सुधारणा होत आहे.
     - संजय पवार, पालक 
 

Web Title: Fingers moving on mobile screen, forgetting to write, side effects of online learning, signature rhythm, lost speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.