आपचे आमदार म्हणतात, अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:26 IST2018-02-23T16:17:34+5:302018-02-23T17:26:38+5:30
दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल...

आपचे आमदार म्हणतात, अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे
नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. उत्तमनगर येथे सभेला संबोधित करताना बलियान यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेली मारहाण योग्य असल्याचे सांगत अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
उपस्थितांना संबोधित करताना नरेश बलियान म्हणाले, "मुख्य सचिवांसोबत जे काही झाले. त्यांनी जो खोटा आरोप केला, ते पाहता अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे मला वाटते. सर्वसामान्य लोकांच्या कामात खोडा घालणाऱ्या, कामे अडवणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत असेच वागले पाहिजे."
दरम्यान, मुख्य सचिव मारहाणी प्रकरणी दोन आमदारांना अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानाची आज झडती घेण्यात आली. यावेळी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे 40 मिनिटे मागे असल्याचे समोर आले आहे. तसेच एकूण 21 कॅमेऱ्यांपैकी केवळ 14 कॅमेरेच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने पीएमओ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आहे. त्यावेळी दिल्ली सरकार अधिकाऱ्यांनां धमकावून काम करवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चर्चेनंतर जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना भयमुक्त होऊन काम करण्यास सांगितल्याची माहिती दिली.