India Lockdown Update: भारतात खरंच लॉकडाऊन लागणार? केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट; पंतप्रधान घेणार महत्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:12 IST2026-03-27T13:11:23+5:302026-03-27T13:12:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत आखाती देशातील युद्धावर भाषण दिले. यावेळी मोदी म्हणाले की, या संकटाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल आणि कोविड-१९ च्या संकटाप्रमाणेच नागरिकांना त्याचा सामना करावा लागेल.

India Lockdown Update: भारतात खरंच लॉकडाऊन लागणार? केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट; पंतप्रधान घेणार महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत पश्चिम आशियातील युद्धाच्या संकटाची तुलना 'कोविड-१९' शी केल्यानंतर, देशभर पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये पश्चिम आशियाई युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तयारीचा आढावा घेतला जाईल.
पंतप्रधानांनी युद्धाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते, ज्याचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर अफवा पसरल्या. यामुळे अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्रीय मंत्रीहरदीप सिंह पुरी यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.
When rest of the world has been taking drastic fuel conservation measures such as odd-even, 4 day work weeks, school and office closures and increasing fuel prices by 20-30%, India under PM @narendramodi Ji remains an oasis of energy security, availability and affordability.… pic.twitter.com/5aTZfGiKGE
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
हरदीप सिंह पुरी यांचे स्पष्टीकरण: "भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही," असे ट्विट केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी केले.
मोदी नक्की काय म्हणाले?: पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 'लॉकडाऊन' हा शब्द एकदाही वापरला नाही. त्यांनी केवळ युद्धाचे संकट कोविडसारखे दीर्घकाळ टिकणारे असू शकते, असे सांगत नागरिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले होते.
ममता बॅनर्जींचा निशाणा: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, "आम्ही आधी कोविडशी लढलो आहोत, आता पुन्हा कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहोत." त्यांनी गॅस बुकिंगच्या नियमांवरूनही सरकारला धारेवर धरले.
मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी घेणार बैठक
पंतप्रधान मोदी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत (निवडणूक होणारी राज्ये वगळता) एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यामध्ये पश्चिम आशियाई युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तयारीचा आढावा घेतला जाईल.
देशात सध्या कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर किंवा दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे सांगण्यात येत आहे.