Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने स्थापन केलेल्या शिष्टमंडळात थरुर सामील असून, परदेशात ते भारताची बाजू भक्कमपणे सांभाळत आहेत. पण, यावरुन त्यांच्याच पक्षातील काही नेते त्यांच्याविरुद्ध अतिशय टोकाची विधाने करत आहेत. अशा विधानांमुळे सोशल मीडियावर थरुर काँग्रेस पक्षात राहतील की, भाजपमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे? याबाबत आता स्वतः थरुर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले थरूर ?शशी थरूर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. ते विविध देशांमध्ये जाऊन दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत भारताच्या धोरणाची माहिती देत आहेत. सध्या थरूर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये आहेत. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेस पक्षाचे नेते ज्या प्रकारे तुमच्यावर टीका करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात आहे की, तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील व्हाल किंवा वेगळा राजकीय मार्ग निवडाल. या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देताना थरूर म्हणाले की, 'मी संसदेचा निवडून आलेला सदस्य आहे, माझ्याकडे अजूनही ४ वर्षे शिल्लक आहेत, असा प्रश्न कोणी उपस्थित करू नये,' अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली.
काँग्रेस नेत्यांची टीका?शशी थरूर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. ते विविध देशांमध्ये जाऊन दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत भारताच्या धोरणाची माहिती देत आहेत. पण, यामुळेच आता ते काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर भाजपचे प्रवक्ते झाल्याची टीका केली. त्यामुळेच आता त्यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते उदित राज यांनी थरुर यांना लक्ष्य करताना म्हटले की, काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले, परंतु त्यांनी काँग्रेसविरुद्ध विधाने करुन स्पष्ट केले की, त्यांना काँग्रेसचे कल्याण नको आहे. दुसरीकडे, पवन खेरा म्हणाले होते की, शशी थरुर यांनी त्यांच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकवर टीका केली होती, परंतु आता ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचे कौतुक करत आहेत. त्यांना काँग्रेस नेत्यांनी भाजपचे सुपर प्रवक्तादेखील म्हटले.
भाजपकडून थरुर यांचे कौतुकएकीकडे काँग्रेस थरुर यांना लक्ष्य करत आहे, तर भाजप त्यांची प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षाचे असूनही, थरुर यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची खूप जाणीव आहे आणि ते त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत.