आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 06:06 IST2026-04-07T06:05:15+5:302026-04-07T06:06:10+5:30
स्वबळावर सत्ता मिळवणे भाजपसाठी मोठे आव्हान, मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा कळीचा

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
आसाम, लोकमत न्यूज नेटवर्क, गुवाहाटी : ईशान्य भारतातील राजकारणाला दिशा देणाऱ्या आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा व काँग्रेसचे गौरव गोगोई यांच्या राजकीय अस्तित्वाची व भवितव्याची लढाई आहे. राज्यात स्वबळावर सत्ता मिळवणे हे भाजपसाठी आव्हान असून, हॅट्-ट्रिक करण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.
अस्मितेच्या राजकारणापासून ते झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाच्या तपासापर्यंतच्या भावनिक मुद्द्यांसह अनेक घटक या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. सुशासन, कल्याणकारी योजना आणि ‘जाती, माती, भेटी’ या धोरणाच्या माध्यमातून भाजप आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस नवीन नेतृत्वाला पुढे करीत सत्ताविरोधी लाट व सामाजिक समीकरणाचा फायदा घेण्यासाठी आघाडी करून स्वतःला नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
काँग्रेसची पकड असलेल्या राज्यात २०१६ मध्ये खऱ्या अर्थाने भाजपच्या उदयाला सुरुवात झाली. तेव्हा भाजपने काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. मात्र, ६० जागा मिळवूनदेखील भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. २०२१ च्या निवडणुकीतही हाच कल दिसून आला. या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा ६० जागा जिंकल्या. त्यामुळे बहुमताच्या ६४ जागांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांवरच अवलंबून राहावे लागले होते.
भाजप
भाजपच्या जमेच्या बाजू...
- सरमा यांचे प्रभावी नेतृत्व
- ‘जाती-माती-भेटी’चा मुद्दा
- मजबूत संघटना, एनडीए आघाडी
- विकास, पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजना
कमकुवत बाजू...
- सत्ताविरोधी लाट
- बेरोजगारी, महागाई हे प्रश्न
- काही भागांत नाराजी
यामुळे भाजपला संधी...
- विरोधकांमधील फूट
- घुसखोरीचा मुद्दा प्रभावी
- मतदारांचा स्थिरतेकडे कल
काँग्रेस
काँग्रेसच्या जमेच्या बाजू...
- गौरव गोगोई यांचे नवे नेतृत्व
- अल्पसंख्याक, सामाजिक समीकरणांवर पकड
- विरोधी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न
कमकुवत बाजू...
- संघटन कमकुवत
- नेत्यांचे पक्षांतर
- सातत्याने पराभवाची पार्श्वभूमी
यामुळे काँग्रेसला संधी...
- सत्तेविरोधी लाट
- युवा नेतृत्वामुळे नवा उत्साह
- आघाड्यांमुळे मतांचे एकत्रीकरण