सात फेरे घेत असतानाच नवरदेवाच्या छातीत कळ आली; नवरीला अर्ध्यावरच सोडून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 20:45 IST2025-01-19T20:45:04+5:302025-01-19T20:45:27+5:30
नवरदेवाचे स्वत:चे मेडिकल स्टोअर होते. लग्नाच्या दगदगीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सात फेरे घेत असतानाच नवरदेवाच्या छातीत कळ आली; नवरीला अर्ध्यावरच सोडून गेला
सागर : मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नावेळी सात फेरे घेताना नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. यामुळे नवरीसह दोन्ही बाजुच्या वऱ्हाडींना मोठा धक्का बसला आहे. संसारच नाही तर लग्न अर्ध्यावर सोडून नवरदेव गेला आहे.
लग्नाचे निम्मे विधी झालेले होते, तर निम्मे विधी व्हायचे होते. सात फेरे घेत असताना नवरदेवाच्या अचानक छातीत कळ आली आणि तो खालीच कोसळला. नवरदेवाला चक्कर आली असावी म्हणून त्याला उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, तो काही उठत नसल्याचे पाहून त्याला हॉस्पिटलला हलविण्यात आले.
ईसीजी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूच्या बातमीने वरातींमध्ये एकच खळबळ उडाली. आनंदाचा क्षण अचानक दु:खात बदलला. नवरीचे आयुष्य लग्न होता होताच बरबाद झाले. हर्षित असे या नवरदेवाचे नाव असून बँडबाजा, घोडागाडी अशा तामझामात लग्न करण्यात येत होते. वराती मध्यरात्रीपर्यंत नाचत होते. रात्री १२ वाजता हार घालण्यात आले. नंतर दोन-तीन तास फोटोसेशन सुरु होते. नवरा-नवरी विश्रांतीसाठी गेले. सकाळी पुन्हा ६ वाजता सात फेरे घ्यायचे होते.
या दगदगीमुळे नवरदेवाला हार्ट अॅटॅक आल्याचे सांगितले जात आहे. नवरदेवाचे स्वत:चे मेडिकल स्टोअर होते.