रस्ते अपघातात कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू? नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:20 IST2024-12-12T21:19:40+5:302024-12-12T21:20:12+5:30

Nitin Gadkari in Lok Sabha : गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले.

Which state has the highest number of deaths in road accidents? Nitin Gadkari expressed concern | रस्ते अपघातात कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू? नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

रस्ते अपघातात कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू? नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Nitin Gadkari in Lok Sabha : नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात होत असलेल्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर २०२४ पर्यंत रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याबाबत बोललो होतो. पण, अपघात कमी झाले नाहीत, उलट परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातो. त्यावेळी, तिथे रस्ते अपघातांचा विषय आला की, मी माझे तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले. यावेळी,  अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत अपघात थांबवणे फार कठीण आहे. हा एकमेव विषय आहे, ज्यात आमच्या विभागाला यश मिळाले नाही. तेव्हा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने रस्ते अपघात कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर, नितीन गडकरी यांनी यावेळी एक वैयक्तिक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता होतो. ज्यावेळी कुटुंबासह माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी ट्रकच्या टायरखाली माझे कुटुंब आले होते. या घटनेमुळे माझे कुटुंब बराच काळ रुग्णालयात दाखल होते. मात्र, देवाच्या कृपेने मी व माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मी त्याबाबत खूप संवेदनशील आहे

पुढे नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रक अपघातांसाठी मोठे कारण बनत आहेत. तसेच अनेक ट्रकचालक महामार्गावर लेनची शिस्त पाळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताचे उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतात बस बनविणाऱ्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार बस निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून अपघातानंतर खिडकीजवळ असलेल्या हातोडीने काच फोडून प्रवाशाला तात्काळ बाहेर पडता येईल.

कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू?
भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाल्याचा आकडा आहे. एकूण अपघातांपैकी १३.७ टक्के म्हणजे २३,००० मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये १०.६ टक्के म्हणजे १८,००० मृत्यू झाले. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र असून ९ टक्के म्हणजेच १५,००० मृत्यू झाले आहेत.शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्वाधिक मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत वर्षाला १,४०० मृत्यू झाले असून त्याखालोखाल बंगळुरू(९१५ मृत्यू) आणि जयपूरचा (९१५ मृत्यू) क्रमांक लागतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
 

Web Title: Which state has the highest number of deaths in road accidents? Nitin Gadkari expressed concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.