सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:07 IST2025-06-01T14:06:47+5:302025-06-01T14:07:20+5:30
Pawan Kalyan News: ईशनिंदेवर नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले.

सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
प्रक्षोभक विधान केल्याने पुण्यातील विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला झालेल्या अटकेवरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शर्मिष्ठा पनोली हिला पाठिंबा दिला आहे. तसेच ईशनिंदेवर नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता ही काही लोकांसाठी ढाल आणि इतरांसाठी तलवार नाही आहे. ती दुधारी असली पाहिजे. पश्चिम बंगाल पोलिसांकडे राष्ट्राची नजर लागलेली आहे. त्यांनी सर्वांसाठी न्यायपूर्ण पद्धतीने काम करावं.
पवन कल्याण म्हणाले की, जेव्हा राजकीय नेते, तृणमूल काँग्रेसचे खासदार हे सनातन धर्माची खिल्ली उडवतात, तेव्हा काय होतं? जेव्हा आमच्या धर्माला घाणेरडा धर्म म्हटलं जातं, तेव्हा हा आक्रोश कुठे जातो. त्यांची माफी कुठे जाते. त्यांची त्वरित अटकेची कारवाई कुठे होते? असा सवाल पवन कल्याण यांनी विचारला.
भाजपाच्या बंगालमधील कार्यकारिणीनेही कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पानोली हिच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी रातोरात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शर्मिष्ठा हिच्यावर एका विशिष्ट्य समूदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे व्होटबँकेचं राजकारण असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणाले की, शर्मिष्ठा हिला हटवण्यात आलेल्या एका व्हिडीओवरून का अटक करण्यात आली आहे? शर्मिष्ठा हिने सार्वजनिकरीत्या माफी मागितली होती, तसेच तिच्या व्हिडीओमध्येही फारसं आक्षेपार्ह असं काही नव्हतं, असा दावाही त्यांनी केला आहे.