बंगाल : भाजप-तृणमूलमध्ये थेट लढत; डाव्यांचा अस्तित्वाचा लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:07 IST2026-04-04T15:07:18+5:302026-04-04T15:07:18+5:30
बंगाली अस्मितेसह एलपीजी टंचाई, एसआयआर, नोटाबंदी, लॉकडाउन प्रचाराचे मुद्दे

बंगाल : भाजप-तृणमूलमध्ये थेट लढत; डाव्यांचा अस्तित्वाचा लढा
कोलकाता: प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात बहुतांश मतदारसंघांत थेट लढतींची शक्यता असून ६ मेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. २९४ जागांसाठी ही निवडणूक होत असून एका पक्षाला बहुमतासाठी १४८ जागांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने शक्ती पणाला लावली आहे. तर, त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला आहे.
उत्तर बंगाल निर्णायक : या भागात ५४ विधानसभा जागा असून त्या निर्णायक ठरू शकतात. कारण, दार्जिलिंगच्या डोंगराळ भागांत गोरखा मुद्दा आणि स्वायत्तता हे मुद्दे संवेदनशील असून जलपाईगुडीमध्ये चहाच्या मळ्यातील कामगार व आदिवासींची भूमिका महत्त्वाची ठरते. उत्तर व दक्षिण दिनाजपूरमध्ये कृषी क्षेत्रावर आधारित मुद्दे संवेदनशील ठरतात.
एसआयआर संवेदनशील : भागांत राज्याच्या तृणमूलचे वर्चस्व असलेल्या बहुतांश मतदारयाद्या पुनरिक्षणाचा (एसआयआर) मुद्दा प्रचंड तापलेला आहे. तर भाजपने घुसखोरांचा मुद्दा लावून धरला आहे. दोन्ही पक्ष या मुद्द्यांची आव्हाने कशी पेलतात यावर राजकीय भवितव्य ठरणार आहे.
६० लाख मतदारांचे काय? : राज्यात एसआयआरनंतर सुमारे ६० लाख मतदारांची नावे विचाराधीन यादीत समाविष्ट आहेत. यावरून प्रचंड वाद पेटला असून तृणमूल काँग्रेसने याविरुद्ध प्रचारात आघाडी उघडली आहे.
एमआयएमची पहिली यादी जाहीर
या विधानसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम पक्षाने १२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. हुमायूं कबीर यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष 'आम जनता उन्नयन पार्टी'सोबत युती करून मैदानात उतरला आहे.
असा झाला राजकीय बदल
प. बंगालमध्ये ३४ वर्षे डाव्या पक्षांची सत्ता होती. मात्र, कालांतराने तृणमूल काँग्रेसची शक्ती वाढत गेली आणि डावे तसेच काँग्रेस शक्तिहीन झाले. याचा थेट लाभ भाजपला मिळाला.
निवडणूक निरीक्षकांना घेरल्याप्रकरणी बंगालमध्ये सूत्रधारासह दोघे अटकेत
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बुधवारी एका महिलेसह सात निवडणूक निरीक्षकांना घेराव घालून सुमारे नऊ तास ओलिस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सिलिगुडी येथील बागडोगरा विमानतळावर कथित सूत्रधारासह दोघांना अटक केली. या आरोपीचे नाव अॅड. मोफक्करूल इस्लाम असून, विमानात चढण्याचा प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली. इस्लाम हा उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटहारचा रहिवासी असून, सध्या कोलकाता येथे राहत आहे. त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
काय आहेत आरोप ?
वर्ष जागा मते स्थानिक लोकांना भडकावल्याचा आरोप मोफक्करूल याच्यावर असून, कालिआचक पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत इंडियन सेक्युलर फ्रंटच्या (आयएसएफ) एका उमेदवारासह ३५ जणांना अटक केली आहे. आणखी काही संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.