"मुस्लीम सर्व काही सहन करू शकतात, पण...!", 'वंदे मातरम' संदर्भातील नव्या नियमांवरून अरशद मदनी भडकले; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:33 IST2026-02-12T17:29:17+5:302026-02-12T17:33:08+5:30
अरशद मदानी पुढे म्हणाले, "मुस्लीम समाज कुणालाही वंदे मातरम गाण्यापासून अथवा वाजवण्यापासून रोखत नाहीत. मात्र, त्यातील काही ओळी बहुदेववादी श्रद्धेवर आधारित आहेत आणि मातृभूमीला इश्वर म्हणून सादर करतात. हे एकेश्वरवादी धर्मांच्या श्रद्धेशी विसंगत आहे.

"मुस्लीम सर्व काही सहन करू शकतात, पण...!", 'वंदे मातरम' संदर्भातील नव्या नियमांवरून अरशद मदनी भडकले; कारण काय?
केंद्र सरकारने 'वंदे मातरम्' संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. सरकारने बुधवारी (११ फेब्रुवारी) घेतलेल्या निर्णयानुसार, आता सरकारी कार्यक्रम, शाळा आणि महत्त्वाच्या आयोजनांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य असेल. राष्ट्रगीताप्रमाणेच सर्वांना उभे राहून त्याचा सन्मान करावा लागेल. आता सरकारच्या या निर्णयावर मुस्लीम नेते अरशद मदनी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
संविधानाचे उल्लंघन असल्याचा मदनींचा दावा -
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदानी यांनी गुरुवारी 'X'वर एक पोस्ट केली. यात त्यांनी म्हटले आहे, "सर्व सरकारी कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये आणि कार्यक्रमांमध्ये वंदेमातरमच्या सर्व ओळी अनिवार्य करणे, हा पक्षपाती आणि जबरदस्तीने थोपवण्यात आलेला निर्णय आहे. जो संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि अल्पसंख्यकांच्या अधिकारांवर केलेला खुला हल्ला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा निंदनीय प्रयत्न आहे.
वंदेमातरम मधील काही ओळी बहुदेववादी श्रद्धेवर आधारित -
अरशद मदानी पुढे म्हणाले, "मुस्लीम समाज कुणालाही वंदे मातरम गाण्यापासून अथवा वाजवण्यापासून रोखत नाहीत. मात्र, त्यातील काही ओळी बहुदेववादी श्रद्धेवर आधारित आहेत आणि मातृभूमीला इश्वर म्हणून सादर करतात. हे एकेश्वरवादी धर्मांच्या श्रद्धेशी विसंगत आहे. यामुळे केवळ एकाच अल्लाहची पूजा करणाऱ्या मुस्लिमांना ते म्हणण्यास भाग पाडणे हे संविधानाच्या कलम २५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
सरकारवर निशाणा साधताना मदनी म्हणाले, वंदे मातरम अनिवार्य करणे आणि ते नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करणे देशभक्ती नाही तर निवडणुकीचे राजकारण, सांप्रदायिक अजेंडा आणि मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक खेळली जाणारी खेळी आहे. मातृभूमीवरील प्रेम हे घोषणांवरून नाही, तर चारित्र्य आणि बलिदानावरून सिद्ध होते. असे निर्णय केवळ देशाची शांतता, एकता आणि लोकशाही मूल्यांना कमकुवतच करत नाहीत तर संविधानाचेही उल्लंघन करतात, असेही मदनी यांनी म्हटले आहे.