वंदे भारतचे जेवण की...? रांचीच्या महिलेचे ओठ सुजले, २ वर्षांच्या मुलाला डायरिया; IRCTC च्या दाव्यावर प्रवाशाचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:22 IST2026-04-01T13:20:39+5:302026-04-01T13:22:17+5:30
Vande Bharat Express Food Complaint : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट जेवणामुळे रांचीच्या आयुषी सिंह यांना गंभीर ॲलर्जी झाली असून त्यांच्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला आहे. IRCTC ने यावर काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर.

वंदे भारतचे जेवण की...? रांचीच्या महिलेचे ओठ सुजले, २ वर्षांच्या मुलाला डायरिया; IRCTC च्या दाव्यावर प्रवाशाचा संतप्त सवाल
देशातील सर्वात आधुनिक आणि हाय-स्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रांची येथील एक महिला प्रवासी आणि त्यांच्या २ वर्षांच्या चिमुरड्याला ट्रेनमधील जेवण खाल्ल्यानंतर गंभीर प्रकृती स्वास्थ्याचा सामना करावा लागला आहे. सोशल मीडियावर पीडित महिलेने शेअर केलेले फोटो आणि डॉक्टरांची चिठ्ठी पाहून रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
रांची येथील रहिवासी आयुषी सिंह २७ मार्च रोजी ट्रेन नंबर २२५०० (वंदे भारत) च्या कोच E1 मधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी ट्रेनमध्ये दिलेले जेवण घेतले. आयुषी यांचा आरोप आहे की, जेवण खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र ॲलर्जी झाली, ज्यामुळे त्यांचे ओठ सुजले. इतकेच नाही तर त्यांच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या ट्रेनमध्ये दह्याच्या पाकिटात अळ्या सापडल्या होत्या. यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.
@RailwaySeva@drmljn Kindly look into the matter urgently. I was travelling in Vande Bharat 22500 E1 coach on 27.3.26 and after consuming lunch, I developed a severe allergy which could have been life threatening. My Son (2 yrs) too developed diarrhoea. (Photo attached for ref) pic.twitter.com/KBdyppDq4m
— The_Mediocre_Fille (@AyushiS54377868) March 30, 2026
फोटो आणि पुरावे आले समोर
आयुषी यांनी सोशल मीडियावर आपल्या सुजलेल्या ओठांचे फोटो आणि डॉक्टरांनी दिलेली मेडिकल स्लिप शेअर केली आहे. "वेळेवर उपचार मिळाले नसते तर प्रकृती अधिक बिघडली असती," असा दावा त्यांनी केला आहे. अन्नाच्या दर्जासोबतच त्यांनी ट्रेनमध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या चवीवरही शंका उपस्थित केली असून साफसफाईबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
IRCTC ची सफाई: 'सगळं काही ठीक होतं'
या प्रकरणावर रेल्वेची कॅटरिंग संस्था IRCTC ने स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या मते, "त्या दिवशी पुरवण्यात आलेल्या अन्नाची तपासणी केली असता ते समाधानकारक आढळले. इतर कोणत्याही प्रवाशाने अन्नाबाबत तक्रार केली नाही." मात्र, IRCTC च्या या उत्तरावर आयुषी समाधानी नाहीत. "इतरांना त्रास झाला नसेल, पण मला आणि माझ्या मुलाला याचा फटका बसला आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.