"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:51 IST2025-02-19T16:48:25+5:302025-02-19T16:51:18+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे

"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण
Yogi Adityanath on Mahakumbh Sangam Water: महाकुंभातील त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नदीचे पाणी स्नान करण्यासाठी चांगले नसल्याचे अहवालातून समोर आलं आहे. त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रिपोर्टवरुन सध्या वाद सुरु आहे. हे पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी योग्य नसल्याचे समोर आलं आहे. या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत भाषण करताना महाकुंभाचा उल्लेख करत समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवरुन होणाऱ्या दाव्यावरही भाष्य केलं. महाकुंभातील संगमचे पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठीही योग्य असल्याचे मुख्यमंत्री योगींनी स्पष्टपणे सांगितले. संगमच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्के असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीकडे हा अहवाल सादर केला. महाकुंभ मेळ्याच्या दौऱ्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकल कोलीफॉर्मची पातळी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नसल्याचे अहवालातून सांगण्यात आलं. त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाणी केवळ आंघोळीसाठी योग्य नसून ते पिण्यासही योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. हा महाकुंभ बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. तसेच संगम आणि परिसरातील सर्व नाल्यांना टेप करण्यात आले असून शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जात आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
"उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सतत निरीक्षण करत आहे. आजच्या अहवालानुसार, संगम जवळील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण ८-९ च्या आसपास आहे. म्हणजे संगमाचे पाणी केवळ आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. फेकल कोलीफॉर्म वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की सांडपाण्याची गळती आणि प्राण्यांची विष्ठा. पण प्रयागराजमध्ये फेकल कोलीफॉर्मचे प्रमाण मानकांनुसार १०० मिलीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ हा खोटा प्रचार महाकुंभाला बदनाम करण्यासाठीच आहे," असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.