बिहारच्या आदित्य अद्वैत पांडेची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्याने असा काही निर्धार केला की आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाटण्याचा रहिवासी असलेल्या आदित्यने दिवस-रात्र मेहनत केली आणि अखेर यश आपल्याकडे खेचून आणलं. देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा देण्याचं त्याने ठरवलं आणि त्यात तो यशस्वी झाला, आज तो एक IAS अधिकारी आहे.
विशेष म्हणजे, ज्याला एकेकाळी UPSC मधलं काहीच माहित नव्हतं, त्याने आज हे शिखर सर केलं आहे. प्रेमात अपयश आल्यावर, "मी एक दिवस IAS बनून दाखवेन" असं त्याने आपल्या गर्लफ्रेंडला म्हटलं होतं.
हा प्रवास सोपा नव्हता. आदित्यने UPSC च्या तयारीसाठी आपली नोकरी सोडली. २०२१ आणि २०२२ च्या प्रयत्नांत त्याला अपयश आलं. मात्र हार न मानता त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि २०२३ च्या निकालात ऑल इंडिया ४८ वी रँक मिळवून आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. सध्या तो झारखंडमधील रांची येथे कार्यरत आहे.
आदित्य ९वी पर्यंत अभ्यासात हुशार होता, पण दहावीत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याचा परिणाम निकालावर झाला. १२वीनंतर त्याला इंग्लिश ऑनर्स करायचं होतं, पण वडिलांच्या आग्रहामुळे त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. दहावीत ज्या मुलीवर त्याने प्रेम केलं, तिने ब्रेकअप केल्यावर आदित्यने अधिकारी बनून बदला घेण्याचं ठरवलं होतं. कोणतीही विशेष पार्श्वभूमी नसताना त्याने मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं.