चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:21 IST2026-04-10T20:19:03+5:302026-04-10T20:21:06+5:30
हात-पाय बांधून मुलांना कारच्या डिक्कीत ठेवले; दोघेही बचावले!

चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
गुरुग्राम: हरियाणातील गुरुग्राम येथून अपहरण करण्यात आलेल्या दोन चिमुकल्यांचा भीषण अपघातातून चमत्कारिक बचाव झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्ते मुलांना कारच्या डिकीत घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही लहान मुले सुखरूप बचावली.
अपहरणाची थरारक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी एका कॅब चालकासह त्याच्या दोन लहान मुलांचे अपहरण केले. वडिलांना एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले, तर तीन आणि सहा वर्षांच्या मुलांचे हात-पाय बांधून त्यांना बोलेरो गाडीच्या डिकीत टाकण्यात आले.
वेगात असताना कारचा अपघात
अपहरणकर्ते मुलांना दुसऱ्या ठिकाणी नेत असताना मुरादाबाद-दिल्ली महामार्गावर गाडी अतिवेगात होती. रस्त्यावरील कामामुळे चालकाने गाडी चुकीच्या बाजूने घेतली आणि नियंत्रण सुटल्याने ती उभी असलेल्या टँकरवर जोरात आदळली. यावेळी मागून येणारी मोटारसायकलही गाडीला धडकली. या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचाही मृत्यू झाला.
डिकीतून मुलांचा बचाव
अपघात इतका भीषण होता की, गाडी पूर्णपणे चिरडली गेली. मात्र, मागील डिकीचा भाग तुलनेने सुरक्षित राहिला. पोलिसांनी तपास करताना डिकी उघडली असता त्यात हात-पाय बांधलेली दोन मुले आढळून आली. दोघेही घाबरलेल्या अवस्थेत होते, मात्र जिवंत होते.
३ अपहरणकर्त्यांचा मृत्यू, एक जखमी
अपघातात गाडीत असलेल्या चार आरोपींपैकी तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. मुलांपैकी एका मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. मात्र, सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे.
पोलिस तपासात धक्कादायक खुलासा
जखमी आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणामागे वैयक्तिक वैर असल्याचे उघड झाले. आरोपींपैकी एकाला पीडितेच्या दत्तक मुलीशी संबंध होते, ज्याला कुटुंबीयांनी विरोध केला होता. त्यातूनच सूडाच्या भावनेतून हे अपहरण केल्याचे समोर आले. दरम्यान, आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बरेली येथील ठिकाणाहून मुलांच्या वडीलांना वाचवले.