ट्रक असो की बस की कार... दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार; गडकरींनी केली नव्या तंत्रज्ञानाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:53 IST2023-08-02T15:52:49+5:302023-08-02T15:53:13+5:30
आता बांबू क्रॅश बॅरियर्स देखील बनविण्यात आले आहेत. आसाममधून येणारे बांबूंचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रक असो की बस की कार... दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार; गडकरींनी केली नव्या तंत्रज्ञानाची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हायवेवरील ट्रक, बस आणि कारच्या अपघातांवर एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. राज्यसभेतील स्वीकृत सदस्य गुलाम अली यांनी एक प्रश्न विचारला होता. यावर गडकरींनी हे उत्तर दिले आहे. तसेच दुर्गम भागांत सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.
काश्मीरमध्ये हायवेंवर ट्रक अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. रस्त्यांवर क्रॅश बॅरिअर असतात परंतू ट्रकचे वजन एवढे असते की जर तो ट्रक घसरून खाली कोसळतो, आजुबाजुला हायड्रो प्रोजेक्ट असल्याने तो ट्रक तर सापडत नाही पण मृतदेहही सापडत नाहीत. यामुळे डोड्डा ते किश्तवाड आणि उधमपूर ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाती क्रॅश बॅरिअर्स बसवल्यास अपघात थोडे कमी होऊ शकतात, अशी मागणी अली यांनी केली.
यावर गडकरी यांनी उत्तर दिले. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर मागे येतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात. असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करू. या तंत्रज्ञानाचा प्रयोग आम्ही काही ठिकाणी केला आहे, असे गडकरी म्हणाले.
आता बांबू क्रॅश बॅरियर्स देखील बनविण्यात आले आहेत. आसाममधून येणारे बांबूंचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळत आहे, असे गडकरी म्हणाले.