अमेरिका आणि इस्राइलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धानंतर व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची इराणने नाकेबंदी केली आहे. दरम्यान, आज याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आखातामधून भारतातील कांडला बंदराच्या दिशेने येत असलेल्या थायलंडच्या जहाराजावर हल्ला झाला होता. आता या हल्ल्याविरोधात भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
होर्मुझच्या आखातामधून थायलंडचे मयुरी नारी हे जहाज भारतातील गुजरात राज्यामधील कांडला येथील बंदरात येत होते. दरम्यान, आज या जहाजाला लक्ष्य करून आज हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे सांगितले.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार या हल्ल्यांची घातकता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे निर्दोष नागरिक आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वातंत्र्याचा सन्मान झाला पाहिजे. तसेच नागरी जहाजांना लष्करी हल्ल्यांपासून दूर ठेवले पाहिजे, असेही भारताने ठणकावून सांगितले आहे.
दरम्यान, बुधवारी ११ मार्च रोजी होर्मुजच्या सामुद्रधुनीत थायलंडचा झेंडा असलेल्या 'मयूरी नारी' या महाकाय मालवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, जहाजावरील २३ पैकी २० कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे, तर ३ जण अद्याप बेपत्ता आहेत. 'प्रेशियस शिपिंग' या कंपनीचे हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील खलिफा बंदरावरून भारताच्या गुजरात राज्यातील कंडला बंदराकडे निघाले होते. मात्र, होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडत असताना ओमानच्या उत्तर किनारपट्टीपासून ११ सागरी मैलांवर या जहाजाला लक्ष्य करण्यात आले होते.