ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:55 IST2025-06-17T15:55:08+5:302025-06-17T15:55:08+5:30
West Bengal Government: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे.

ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामधून शेकडो घुसखोरांची पडताळणी करून त्यांना बांगलादेशात माघारी धाडण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे. हे सर्व जण पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापैकी ४ जण हे मुर्शिदाबाद येथील तर एक जण पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर होत असलेल्या कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे.
पश्चिम बंगाल मायग्रेट वेल्फेयर बोर्डाचे प्रमुख समीरुल इस्लाम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशान्वये राज्य सरकार आणि पोलिसांनी केंद्र सरकार आणि बीएसएफला या संदर्भातील माहिती दिली. त्यानंतर मेहबूब शेख आणि शमीम खान यांना सोमवारी भारतात आणण्यात आले. तर इतरांना रविवारी भारतात आणण्यात आले होते.
त्यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील आणखीही काही नागरिकांना बांगलादेशी समजून बांगलादेशमध्ये पाठवण्यात आले का, याचा शोध आम्ही घेत आहोत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. तसेच भाजपा बंगाली भाषक नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे.