विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:21 IST2025-06-01T06:19:31+5:302025-06-01T06:21:19+5:30
भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.

विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
सिंगापूर : पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारतीय विमानांची हानी झाल्याचे भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अप्रत्यक्ष मान्य केले. परंतु भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. विमाने का पाडली गेली याची कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल, असेही त्यांनी सांगितले.
चौहान हे सिंगापूरमध्ये शांग्रीला संवाद परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझ्या मते, विमान पाडण्यात आले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या कारणांमुळे ते पाडले हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही आखलेल्या डावपेचांतील चुका आमच्या लक्षात आल्या. त्या आम्ही सुधारल्या आणि पुन्हा दोन दिवसांनी अमलात आणल्या. आम्ही पुन्हा हवाई हल्ले करून ठरविलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले.
पाकिस्तानचा दावा काय?
७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली, ज्यामध्ये ५ भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. पाच विमानांमध्ये ३ राफेल होते. नंतर, पाकने ६ भारतीय विमाने पाडल्याचा दावा करण्यास सुरुवात केली.
काय म्हणाले एअर मार्शल भारती?
भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन्स विभागाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मे रोजी पत्रकारांना सांगितले होते की, लढाईमध्ये हानी होतच असते. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले भारतीय हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षित परत आले.
पाक चेकपोस्टवर तालिबानचा हल्ला
काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान-सिंध प्रांतात स्वातंत्र्य लढा पेटत असताना अफगाणिस्तानशीही आता सीमावाद पेटला आहे. अफगाणच्या हेलमंद प्रांतात चगई जिल्ह्यालगत सीमेवर तालिबानने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ले केले. उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
बलुचिस्तान पेटले
बलुच लिबिरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराला चकवा देत सोराब शहरावर पूर्ण ताबा मिळवला असून या भागातील सर्व बँका, पोलिस ठाणी आणि सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवल्याचा दावा बीएलएचे प्रवक्ते जियांद बलूच यांनी माध्यमांना माहिती देताना केला.
जम्मू-काश्मीर, गुजरातसह ६ राज्यांमध्ये ब्लॅकआउट
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन शिल्ड’ अंतर्गत शनिवारी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये दिवसा मॉक ड्रिल करण्यात आल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता, या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी संबंधित भागांत सायरनचे मोठ्याने आवाज ऐकू आले. त्यापूर्वी या राज्यांत संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मॉक ड्रिलचा भाग म्हणून एअर स्ट्राइक ड्रिल आयोजित केली होती. जखमींना वाचवणे, वैद्यकीय मदत देणे, आग लागल्यास अग्निशमन दलाकडून त्वरित प्रतिसाद इत्यादी बाबींचा सराव करण्यात आला.
यापूर्वी ब्लॅकआउट कधी?
७ मे रोजी देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २४४ शहरांमध्ये १२ मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला. गृह मंत्रालयाने या शहरांना नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केले होते.