The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:20 IST2022-03-22T17:19:51+5:302022-03-22T17:20:35+5:30
The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files
नवी दिल्ली - सध्या गाजत असलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाने ९० च्या दशकाच्या सुरुवातील काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्यावर आलेल्या पलायनाच्या वेळेचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आले आहे, ते पूर्णपणे वास्तवाच्या आधारावर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
जम्मू काश्मीरमधील रहिवासी असलेले हिंदू जे पंचगौडा ब्राह्मण समुहाशी संबंधित सारस्वत ब्राह्मण समुहाचा भाग आहेत त्यांना काश्मिरी पंडित म्हटले जाते. १९९० मध्ये जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पेटला तेव्हा काश्मिरी पंडितांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून हाकलण्यात आले. काश्मीरमधून सुमारे ४४ हजार ६८४ काश्मिरी पंडित विस्थापित झाले आहेत. त्यामध्ये १ लाख ५४ हजार ७१२ लोकांचा समावेश आहे, असे यावर्षी सरकारने राज्यसभेमध्ये सांगितले होते. तर गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १९८९नंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामध्ये २१९ काश्मिरी पंडितांची हत्या झाली होती.
काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा खोऱ्यामध्ये वसवण्यासाठी ९२० कोटी रुपये खर्च करून ६ हजार ट्रान्झिस्ट घरे तयार करण्यात येत आहेत. तसेच गेल्या सहा वर्षांमध्ये ६१० काश्मिरी पंडितांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत सरकारने तरतूद केलेल्या नोकऱ्यांमुळे सुमारे ३ हजार ८०० काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परतले आहेत. तसेच केंद्र सरकारकडून काश्मिरी पंडितांना दरमहा आर्थिक मदत आणि धान्य दिले जाते.