भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव! बीएसएफने फायरिंग केल्याचा दावा; दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:02 IST2025-05-27T16:01:40+5:302025-05-27T16:02:12+5:30
India-Bangladesh Border: मंगळवारी पहाटे बांगलादेश सीमेवर मोठी घडामोड घडली आहे. बीएसएफने फायरिंगही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत.

भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव! बीएसएफने फायरिंग केल्याचा दावा; दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने
एकीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना आता बांगलादेश सीमेवरही दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले आहे. मंगळवारी पहाटे बांगलादेश सीमेवर मोठी घडामोड घडली आहे. बीएसएफने फायरिंगही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत.
बांगलादेश सीमेवरील बांगलादेशच्या कुरीग्राम आणि आसामच्या मनकाछार अशा दोन ठिकाणी सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेश बॉर्डर गार्ड समोरासमोर आले आहेत. बांगलादेशच्या कुरीग्राम जिल्ह्यातील रौमारी उपजिल्ह्यातील बोराईबारी सीमेवर बीएसएफने १४ लोकांना नो मॅन्स लँडमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. सीमेवरील स्तंभ १०६७ वर ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या लोकांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिला असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार बीएसएफने चार फैरीही झाडल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशच्या बीजीबीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांततेत हाताळल्याचे म्हटले आहे.
या घटनेवर बीएसएफ गुवाहाटी फ्रंटियरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. २७ मे रोजी पहाटे, बीएसएफ जवानांना भारतीय हद्दीत घुसण्याच्या उद्देशाने बांगलादेशच्या बाजूने आंतरराष्ट्रीय सीमेकडे येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांना रोखण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तर शांतता राखण्यासाठी बीजीबीने ध्वज बैठक बोलावण्याचा प्रस्ताव बीएसएफला दिला आहे. यावर अद्याप काही बीएसएफकडून प्रतिक्रिया आलेली नाही, असे बीजीबीच्या जमालपूर बटालियन-३५ चे सहाय्यक संचालक शमसुल हक यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे आसामच्या मानकाचर सीमेवरही बीएसएफने गोळीबार केल्याचे वृत्त आहे. बीएसएफने शून्य रेषेवर चार राउंड झाडल्या. बीएसएफने इथेही घुसखोरी रोखली होती. यामुळे या भागातही परिस्थिती तणावपूर्ण आहे.