‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा; सरकार म्हणते, परवानगी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:19 IST2023-08-28T05:36:36+5:302023-08-28T07:19:08+5:30
राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

‘जलाभिषेक’ने वाढला तणाव, नूहसह अन्य भागात प्रचंड फौजफाटा; सरकार म्हणते, परवानगी नाहीच
- बलवंत तक्षक
चंडीगड : हरयाणातील नूह येथे जलअभिषेक यात्रेचे आयोजन करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही हिंदू महापंचायतीने २८ ऑगस्टला जलअभिषेक यात्रा काढणार असल्याचे स्पष्ट केल्याने तणाव वाढला आहे. यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, इंटरनेट, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी पंचकुलामध्ये सांगितले की, यात्रेला परवानगी दिलेली नाही. यात्रेत सहभागी होण्याऐवजी लोक आपापल्या भागातील मंदिरांमध्ये जलाभिषेकसाठी जाऊ शकतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
ते म्हणतात...परवानगीची गरज नाही
- सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने २६ ते २८ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे.
- नूह येथील पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलाच्या २४ तुकड्यांशिवाय हरयाणा पोलिसांचे १,९०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केएमपी द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरूच राहणार आहे.
- यात्रेचे आयोजन करणाऱ्या विहिंपने म्हटले आहे की, मिरवणूक काढण्यात येणार असून, अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही.
हरयाणा सुरक्षित, चिंता करू नका
हरयाणा सुरक्षित असून, कोणीही त्याची चिंता करू नये. जर राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर ती पंजाबमध्ये लावण्याची गरज आहे.
- मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री, हरयाणा