नवस पूर्ण करण्यासाठी निखाऱ्यांवरुन धावताना कोसळला भाविक; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:59 IST2025-04-16T18:55:34+5:302025-04-16T18:59:53+5:30
धावत्या निखाऱ्यावरुन पडल्याने तमिळनाडूमध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला

नवस पूर्ण करण्यासाठी निखाऱ्यांवरुन धावताना कोसळला भाविक; उपचारादरम्यान मृत्यू
Tamil Nadu Accident: तमिळनाडूमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात एका धार्मिक उत्सवादरम्यान जळत्या निखाऱ्यांवर पडून एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान या भाविकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवस पूर्ण करण्यासाठी हा भाविक जळत्या निखाऱ्यांवरुन चालत जात होता. मात्र त्यातच भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तामिळनाडूतील रामनाथपुरम येथील कुयावनकुडी येथे मंदिराच्या उत्सवादरम्यान जळत्या निखाऱ्यांवर धावणारा एक भाविक अचानक घसरला आणि त्यामध्ये पडला. यामुळे तो गंभीरपणे भाजला आणि गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्या भाविकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुयावनकुडीच्या सुब्बैया मंदिरात एक उत्सव चालू होता. यामध्ये एक प्रकारचा विधी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भाविकांना जळत्या अंगारांवर चालायचे होते. भाविक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जळत्या निखाऱ्यांनी भरलेल्या खड्ड्यातून अनवाणी जात होते.
१० एप्रिलपासून सुरू झालेल्या थेमिधी थिरुविझाच्या विधीसाठी वलंतरवाई गावातील रहिवासी केशवन देखील आले होते. नवस पूर्ण करताना केशवन यांचा तोल गेला आणि तो जळत्या निखाऱ्यांवर पडले. मंदिरात उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांना ताबडतोब बाहेर काढले आणि रामनाथपुरम जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान केशवन यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तमिळनाडूमध्ये यापूर्वीही अशा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला अवरंगडू येथील अग्नि मरीअम्मन मंदिरात एका उत्सवादरम्यान एक माणूस त्याच्या ६ महिन्यांच्या बाळासह जळत्या निखाऱ्यावर झोपला होता. तर गेल्या वर्षी तिरुवल्लूरमध्ये एका ७ वर्षाच्या मुलाचा पाय घसरून अपघात झाला होता.